Raigad News | रायगड जिल्ह्यात उन्हाच्या झळांमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. वातावरणातील दमटपणाही कमालीचा वाढला असून, तापमान ३६ अंश सेल्सियसच्या वर पोहोचले आहे. सतत वाढत चाललेल्या उष्णतेमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.
तापमानात झपाट्याने वाढ-
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात तापमान वाढत असून, सध्या ते ३५ ते ३७ अंशांदरम्यान फिरते आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आर्द्रतेचा प्रमाणही ७३ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे, ज्यामुळे उकाडा अधिक जाणवतोय. रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अंगाची लाही होणाऱ्या उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यामध्ये अलिबाग, माणगाव, रोहा, महाड, पोलादपूर, पेण, उरण या भागांचा समावेश आहे.
विजेच्या भारनियमनाचा त्रास-
उष्णतेच्या वाढत्या झळांमुळे वीजेच्या वापरात वाढ झाली आहे, परिणामी काही भागांत भारनियमन सुरू झाले आहे. यामुळे नागरिकांना अधिकच त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच काही ठिकाणी पाण्याची टंचाईही भासत असल्याने जनतेची गैरसोय वाढली आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अशा परिस्थितीत नागरिकांनी उन्हापासून बचाव करावा, भरपूर पाणी प्यावे आणि शक्यतो घरात राहावे. उन्हामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि डिहायड्रेशनचा धोका निर्माण होतो.






