Pune Solapur Highway | पुणे–सोलापूर महामार्गावरील वाढती वाहतूक आणि त्यातून निर्माण होणारी कोंडी हा पुणेकरांसाठी गेल्या काही वर्षांपासून जिव्हारी लागलेला प्रश्न आहे. हडपसर परिसरात वाढलेले नागरीकरण, सोलापूरकडून येणाऱ्या वाहनांची संख्या आणि शहराकडे जाणाऱ्या दैनंदिन वाहतुकीचा ताण यामुळे हा मार्ग अनेकदा ठप्प होतो. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील उड्डाणपुलाचा आधीचा संकल्पित प्लॅन बदलून आता त्याची लांबी वाढविण्यात येणार आहे. (Pune Solapur Highway)
राज्य सरकारच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नव्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या नव्या प्लॅननुसार हडपसरऐवजी भैरोबा नाल्यापासून (Bhairoba Nala Yavat) उड्डाणपूल सुरू होईल आणि तो थेट यवतपर्यंत सहापदरी स्वरूपात जाणार आहे. या बदलामुळे प्रकल्पाची एकूण लांबी साडेचार किलोमीटरने वाढणार असून या मार्गावरील कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
39 किलोमीटर लांबीचा नवा मार्ग, वाहतुकीला मोठा दिलासा :
हडपसर-यवत (Hadapsar – Yawat) हा आधीचा उड्डाणपुलाचा प्रस्ताव जवळपास 34.5 किलोमीटरचा होता. मात्र नागरी वाढ आणि वाहतुकीचे बदलते स्वरूप लक्षात घेता आता भैरोबा नाला ते यवत हा सुमारे 39 किलोमीटर लांबीचा नवीन मार्ग आखण्यात आला आहे. या उड्डाणपुलाला सहापदरी बनविण्यात येणार असल्याने मोठ्या वाहनांसह हलक्या वाहतुकीलाही वेगाने मार्गक्रमण करता येईल. पुणे शहरातून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांचा ताण हडपसर भागातून कमी होईल आणि शहरातील प्रमुख रस्त्यांवरील कोंडीही प्रमाणात घटेल.
दररोज हजारो वाहने या मार्गावरून प्रवास करत असतात. सोलापूरहून शहरात येणारे ट्रक, उद्योग क्षेत्रातील वाहतूक यामुळे ही कोंडी अधिकच वाढत चालली आहे. त्यामुळे उड्डाणपुलाची लांबी वाढविणे आणि मार्ग बदलणे हा अत्यावश्यक निर्णय असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे नागरिकांची वेळ, इंधन आणि मेहनत यांची मोठ्या प्रमाणात बचत होईल.
Pune Solapur Highway | बीओटी तत्त्वावर प्रकल्प उभारणी, खर्च वाढण्याची शक्यता :
या विस्तारित प्रकल्पामुळे आधी मंजूर केलेल्या 5,262 कोटी रुपयांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. तरीही हा प्रकल्प बांधा – वापरा – हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर उभारला जाणार असल्याने सरकारी कोषावर तातडीचा भार येणार नाही. काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर टोल वसुली सुरू होईल. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे.
प्रकल्पातील बदल आणि त्याची वाढलेली लांबी लक्षात घेता भविष्यातील वाहतुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा सर्वात योग्य निर्णय असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. पुणे- सोलापूर (Pune-Solapur) महामार्ग हा औद्योगिक, व्यावसायिक आणि दैनंदिन वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याने ही उन्नती भविष्यातील पायाभूत विकासासाठी मोलाची ठरणार आहे.
पुण्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे आणि विस्तारत्या शहरामुळे उड्डाणपुलांसारख्या पायाभूत प्रकल्पांची गरज भासू लागली आहे. नव्या 6 पदरी उड्डाणपुलामुळे केवळ प्रवास वेगवान होणार नाही, तर महामार्गाची सुरक्षा आणि वहनक्षमता दोन्ही वाढणार आहे. त्यामुळे पुणेकरांना या निर्णयाचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.






