Pune News | पुण्यातील कुख्यात रेड लाइट एरियामध्ये एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. नुकतेच पदभार स्वीकारलेल्या पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या नेतृत्वात बुधवार पेठेत (Budhwar peth) दोन टप्प्यात झालेल्या कारवायांमध्ये तब्बल १३ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
फरासखाना पोलीस स्टेशन आणि एटीएसच्या संयुक्त मोहिमेमुळे ही कारवाई शक्य झाली असून, या महिलांकडून प्राथमिक चौकशीत अवैध प्रवेश, बेकायदेशीर वास्तव्य आणि वेश्याव्यवसायात सहभागाची कबुली मिळाली आहे.
कोणत्या महिला ताब्यात? :
२ जुलै रोजी झालेल्या पहिल्या कारवाईत ८ महिला, तर १८ जुलैला रात्री १२ ते सकाळी ४ दरम्यान झालेल्या दुसऱ्या कारवाईत ५ महिलांना ताब्यात घेण्यात आलं. या महिलांची नावे पुढीलप्रमाणे:
जहानारा माजिद शेख (४५)
शिल्पी बेगम रबिउल्ला शेख (२८)
नुसरत जहान निपा (२८)
शिल्पी खालेकमिया अक्तर (३८)
आशा खानाम इयर अली (३०)
यामधील बहुतांश महिला बुधवार पेठेतील मालाबाई वाडा आणि कात्रज भागात वास्तव्य करत होत्या. त्यांचा भारतात प्रवेश बेकायदेशीर असून, त्यांना मूळ देशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Pune News | कसा उघड झाला रॅकेट? :
या कारवायांदरम्यान महिलांनी सांगितलं की, त्या बांगलादेशातून पश्चिम बंगाल मार्गे भारतात प्रवेश करतात आणि मग पुण्यासारख्या शहरात येऊन स्वखुशीने वेश्याव्यवसायात उतरतात. परंतु पोलीस तपासात हे केवळ वरवरचं कारण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण यामागे मुली आणि महिलांची तस्करी करणारे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय पोलीस तपासात व्यक्त करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी सांगितलं की, “बांगलादेशी नागरिक शोधण्यासाठी खास पथक नेमण्यात आलं आहे. आतापर्यंत १३ महिला सापडल्या असून, या मोहिमेचा विस्तार एफसी रोड, डेक्कन आणि अन्य प्रमुख भागांपर्यंत करण्यात आला आहे.”
“या महिलांना भारतात आणणारे एजंट, त्यांच्या मदतीला असलेले पुरुष, तसेच इतर संबंधितांची ओळख पटवण्यासाठी सखोल तपास सुरू आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.






