Pune Mumbai Expressway | राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे (Pune) आणि मुंबई (Mumbai) यांना जोडणाऱ्या प्रमुख मार्गांवर मोठा परिणाम झाला आहे. भूस्खलन, दरडी कोसळणे आणि रस्त्यांवरील धोकादायक परिस्थितीमुळे द्रुतगती मार्गासह जुन्या महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळण्याचा सल्ला देत परिस्थितीबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम :
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा सर्वाधिक फटका पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग (Pune-Mumbai Expressway) आणि जुना मुंबई-पुणे महामार्ग (Old Mumbai-Pune Highway) यांना बसला आहे. मिसिंग लिंक (Missing Link) परिसरात मोठी दरड कोसळल्यामुळे दोन्ही दिशेची वाहतूक काही काळ पूर्णपणे बंद करण्यात आली होती. याशिवाय मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला असून अनेक प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यात आजही रेड अलर्ट लागू असून 8 जुलैपर्यंत जोरदार पावसाचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे. (Pune Mumbai Expressway)
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुणे-मुंबई किंवा मुंबई-पुणे प्रवास शक्यतो टाळण्याचे स्पष्ट आवाहन केले आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय या मार्गावर न जाण्याचा सल्ला देण्यात आला असून, प्रवास करावाच लागल्यास प्रशासन आणि वाहतूक विभागाकडून वेळोवेळी जारी होणाऱ्या अधिकृत सूचनांनुसारच प्रवास करण्याचे सांगण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
Pune Mumbai Expressway | वाहतूक हळूहळू सुरू; बचावकार्य आणि परिस्थितीवर लक्ष :
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील एका लेनवरील वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहे. मात्र मिसिंग लिंक मार्ग अद्याप वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला असून तो पूर्णपणे सुरू होण्यासाठी आणखी दोन ते तीन तास लागू शकतात. दरम्यान, मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक काही प्रमाणात मिसिंग लिंक मार्गावरून सुरू असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मिसिंग लिंकवरील नुकसानीबाबत चिंता व्यक्त करत या घटनेची सखोल माहिती सरकारने नागरिकांसमोर मांडावी आणि तातडीने आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्याचा विचार करावा, अशी मागणी केली आहे.






