Ayush Komkar Murder | पुणे शहरातील नाना पेठ परिसरात झालेल्या आयुष कोमकर (Ayush komkar) हत्याकांडाने राज्य हादरले आहे. या प्रकरणातील आरोपींना पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी न्यायालयात मांडलेली माहिती चकित करणारी आहे. पोलिसांच्या मते, आंदेकर टोळीने कोमकर कुटुंबावर बदला घेण्यासाठी हा कट रचला.
बदला घेण्यासाठी रक्तरंजित थरार :
पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, बंडू आंदेकर (Bandu andekar) याच्या मुलगा वनराज आंदेकरची हत्या झाल्यानंतर त्याला झालेल्या वेदनेइतकंच दु:ख जावयालाही व्हावं, म्हणून आयुष कोमकरचा बळी घेतल्याचा संशय आहे. आयुषची आई कल्याणी कोमकरने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीतील सदस्यांवर थेट आरोप केले आहेत.
या हत्येचा कट एकूण १३ जणांनी रचला होता. त्यापैकी दोन आरोपींनी भवानी पेठमधील पार्किंगमध्ये आयुषवर थेट पिस्तूलने गोळ्या झाडल्या. उर्वरित आरोपींनी योजना आखली होती. आरोपींकडील पिस्तूल, गोळ्या आणि वापरलेली दुचाकी जप्त करणे, तसेच हे शस्त्र कुठून आणले याचा तपास पोलिसांना करायचा आहे. पाच आरोपी अजून फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
Ayush Komkar Murder | सोमनाथ गायकवाडवर हल्ल्याची तयारी :
पोलिसांनी न्यायालयात आणखी एक दावा केला आहे. या टोळीने याआधी सोमनाथ गायकवाड यांच्या घराची रेकी केली होती आणि आंबेगावात त्यांच्या घरी हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता. आरोपींपैकी अनेक हे आधीपासूनच गंभीर गुन्ह्यांत सामील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. काही आरोपींवर २-३ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
हत्या करून अमन पठाण आणि यश पाटील (Yash Patil) यांनी “इथे फक्त बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकरच” अशा घोषणा देत परिसरात दहशत पसरवली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणातील गुन्ह्यात क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम ७ प्रमाणे कलमवाढ केली आहे.






