Tamhini Ghat Accident | पुण्यातील कोंडवे-कोपरे येथील सहा तरुणांचा ताम्हिणी घाटातील थार अपघातात मृत्यू झाल्याची घटना महाराष्ट्राला हादरवून सोडणारी ठरली. 17 नोव्हेंबरच्या रात्री पर्यटनासाठी कोकणात निघालेल्या या तरुणांचा संपर्क दुसऱ्या दिवशीपासून तुटला. अनेक तास कोणतीही माहिती न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आणि अखेरीस पोलिसांना तक्रार देण्यात आली.
या घटनेने संपूर्ण पुणे हादरले असून, तरुणांचा ठावठिकाणा पोलिसांना कसा मिळाला? हे समजताच अनेकांच्या अंगावर काटा आला. कोकणातील एका हॉटेलमध्ये त्यांनी केलेल्या रूम बुकिंगमुळेच अखेरीस या मुलांचा शोध घेण्याचा धागा पोलिसांच्या हाती लागला. त्यांच्या वेळेत न पोहोचल्याने संशय निर्माण झाला आणि नेमकी शोकांतिका उघड झाली. (Tamhini Ghat Accident)
हॉटेल मालकाचा फोन अन् शोधमोहीम सुरू :
सहा तरुण उशिरा रात्री थार गाडीतून पुण्यातून निघाले होते. पण पूर्ण रात्रभर आणि सकाळपर्यंतही त्यांचा कोणाशीही संपर्क झाला नाही. याचदरम्यान ज्या हॉटेलमध्ये त्यांनी रूम बुक केली होती, त्या हॉटेलच्या मालकाने मुलांपैकी एकाच्या मित्राला फोन करून ते अद्याप पोहोचले नसल्याची माहिती दिली. हा संदेश मिळताच घरच्यांची पळापळ सुरू झाली आणि तात्काळ पोलीस चौकीत तक्रार देण्यात आली.
तक्रार मिळताच पोलिसांनी त्यांच्या मोबाइल फोनचे लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात केली. लोकेशन ताम्हिणी घाट परिसरात आढळताच शोधमोहीम अधिक वेगाने सुरू झाली. सीसीटीव्ही फुटेज आणि फोन लोकेशनच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी सकाळी या परिसरात पोहोचून तपासाचा विस्तार केला.
Tamhini Ghat Accident | ड्रोन उडताच दिसली खोल दरीतील थार आणि मृतदेह :
ताम्हिणी घाटातील एक अत्यंत अवघड वळण पोलिसांना संशयास्पद वाटले. तेथे गेल्यानंतर खोल दरी दिसत होती. त्यानंतर रायगड पोलिस, माणगाव पोलीस, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक आणि ग्रामस्थांच्या मदतीने ड्रोनद्वारे शोधमोहीम सुरू करण्यात आली. ड्रोनचे फुटेज पाहताच सर्वांच्या हृदयाचे ठोके थांबले, खोल दरीत उलटलेली थार गाडी आणि त्याभोवती पडलेली सहा मृतदेह! (Tamhini Ghat Accident)
गाडी ज्या पद्धतीने दरीत कोसळली होती, त्यावरून कारचा वेग प्रचंड असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. लोखंडी बॅरिगेट्स आणि खांब तुटून खाली कोसळलेले दिसले, ज्यामुळे अपघाताची भीषणता समोर आली.
मृत तरुणांची ओळख व परिसरातील धक्कादायक शांतता :
साहिल गोठे (24)
शिवा माने (20)
प्रथम चव्हाण (23)
श्री कोळी (19)
ओमकार कोळी (20)
पुनीत शेट्टी (21)
या सर्व तरुणांचे कुटुंब पुण्यातील कोंडवे-कोपरे भागात राहते. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. रातोरात सहा मुलांचा मृत्यू झाल्याने गावात शोक आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.






