Maharashtra Weather | राज्यातील काही भागांमध्ये पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली असून, हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. विशेषत: नाशिक आणि सातारा जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांना यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.
‘या’ भागांना ऑरेंज अलर्ट जारी :
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण किनारपट्टीवर चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव दिसत आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये हवामानात अचानक बदल होत आहेत. परिणामी, पावसाळी वातावरण तयार झाले असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. आज, १५ मे रोजी नाशिक आणि सातारा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे आणि काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्याचा अर्थ या भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. उर्वरित भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, जिथे हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. (Maharashtra Weather)
Maharashtra Weather | अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता कायम :
यापूर्वी राज्यात रत्नागिरी, रायगड, नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर , छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, धाराशिव आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद झाली आहे. विदर्भातील चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे, तर अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता अजूनही कायम आहे.
दरम्यान, यंदा मान्सून अंदमान बेटांवर नेहमीच्या वेळेपेक्षा ८ ते १० दिवस लवकर दाखल झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून २५ ते २७ मे दरम्यान केरळमध्ये, तर सुमारे २ जूनच्या आसपास महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे. मान्सूनची सुरुवात तळकोकणातून होईल आणि त्यानंतर तो हळूहळू संपूर्ण राज्यात पसरेल. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ६ ते १५ जून या काळात संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनमध्ये सक्रिय होईल.






