Namo Shetkari Yojana | केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २१व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली असून हा हप्ता बुधवार, १९ नोव्हेंबर २०२५ रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. महाराष्ट्रातील एकूण ९७ लाख नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी ९० लाख ४१ हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी २,००० रुपयांची मदत मिळणार आहे. फेब्रुवारी 2019 पूर्वी ज्यांच्या नावे शेतीजमीन आहे ते या योजनेसाठी पात्र मानले जातात.
या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील ४ लाख ९० हजार ५६६ शेतकरी या हप्त्याचा लाभ घेणार आहेत. केंद्र सरकारकडून दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले जातात. शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण आणि उत्पादनखर्च कमी करण्यासाठी ही योजना मोठ्या प्रमाणात महत्त्वाची ठरते. (Namo Shetkari Yojana)
पीएम किसाननंतर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता :
केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाकडून ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राबवली जाते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६,००० रुपये दिले जातात. या दोनही योजनांमधून एकत्रितपणे एका कुटुंबातील फक्त एका शेतकऱ्याला वर्षाकाठी १२,००० रुपये मिळणार आहेत. (PM Kisan Installment)
महाराष्ट्र शासनाने दिलेल्या माहितीनुसार, नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता ३० नोव्हेंबरपर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पीएम किसानचा हप्ता मिळाल्यानंतर काही दिवसातच राज्य शासनाचा हप्ता मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मात्र, पती-पत्नीच्या संयुक्त सातबाऱ्यावर जमीन असली तरी लाभ फक्त महिलेलाच मिळणार, असा नव्या नियमाचा प्रभाव सोलापूर जिल्ह्यातील अंदाजे ९,४०० शेतकऱ्यांवर झाला असून त्यांचा लाभ बंद झाला आहे.
Namo Shetkari Yojana | ई-केवायसी अनिवार्य :
दरम्यान, अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी अर्ज केलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईची रक्कम चुकीच्या बँक खात्यांमध्ये जमा झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. ज्यांना रक्कम मिळालेली नाही त्यांनी आपल्या गावातील ‘आपले सरकार सेवा केंद्रा’त (CSC) जाऊन तपासणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. येथे वितरित रक्कम कुठे जमा झाली आहे आणि ती मिळाली की नाही, याची संपूर्ण माहिती उपलब्ध होते.
शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. ज्यांची ई-केवायसी अद्याप बाकी आहे, त्यांनी ती २० नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करणे गरजेचे आहे. अन्यथा, पीएम किसान किंवा नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे हप्ते खात्यात जमा होणार नाहीत. (PM Kisan 21st Installment Date)
सरकारकडून दिल्या जाणाऱ्या या दुहेरी आर्थिक मदतीमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना हंगामी संकटातून दिलासा मिळणार आहे. पीएम किसान व नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे हप्ते महिनाअखेरपर्यंत वितरित झाल्यानंतर रब्बी हंगामातील उत्पादन कार्यात शेतकरी अधिक लक्ष घालू शकणार आहेत.






