Pakistan Players Ban | भारत-पाकिस्तान तणावाचा परिणाम आता आंतरराष्ट्रीय फ्रँचायझी क्रिकेटवरही दिसू लागला आहे. इंग्लंडमधील लोकप्रिय स्पर्धा The Hundred 2026 च्या हंगामापूर्वीच मोठ्या वादात सापडली आहे. भारतीय मालकी असलेल्या चार संघांनी पाकिस्तानी खेळाडूंवर बोली न लावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. (Pakistan 4 Players Ban)
‘द हंड्रेड’च्या लिलाव प्रक्रियेपूर्वीच हा निर्णय अनौपचारिकरीत्या कळवण्यात आला. महिला खेळाडूंसाठी 11 मार्च आणि पुरुष खेळाडूंसाठी 12 मार्च रोजी लिलाव होणार आहे. मात्र भारतीय गुंतवणूक असलेल्या चार फ्रँचायझींकडून पाकिस्तानी क्रिकेटपटूंना करारबद्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, असे संकेत मिळत आहेत.
नेमका निर्णय काय? :
ज्या चार संघांबाबत हा निर्णय लागू असल्याचे सांगितले जाते, त्यामध्ये Manchester Originals, Oval Invincibles, Southern Brave आणि Northern Superchargers यांचा समावेश आहे. या चारही फ्रँचायझींमध्ये भारतीय उद्योगसमूहांची गुंतवणूक आहे.
सुमारे 18 देशांतील जवळपास 1,000 खेळाडू लिलावासाठी नोंदणीकृत असून त्यात पाकिस्तानी क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. मात्र संबंधित चार संघांकडून त्यांच्यावर बोली लावली जाणार नसल्याने त्यांचे भवितव्य अनिश्चित झाले आहे.
Pakistan Players Ban | भारत-पाकिस्तान संबंधांचा परिणाम :
गेल्या काही वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. याचा परिणाम आधीच Indian Premier League (IPL) मध्ये दिसून येतो, जिथे पाकिस्तानी खेळाडूंना संधी दिली जात नाही. त्याचप्रमाणे SA20 आणि CPL सारख्या लीगमधील भारतीय मालकीच्या संघांकडूनही पाकिस्तानच्या खेळाडूंना करार दिले जात नसल्याचे दिसते. (Pakistan Players Ban)
पूर्वी ‘द हंड्रेड’मध्ये मोहम्मद आमीर, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, शादाब खान आणि हरिस रौफ यांसारख्या स्टार खेळाडूंनी सहभाग घेतला होता. मात्र 2026 च्या लिलावात परिस्थिती बदललेली दिसत आहे.
दरम्यान, इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ECB) अधिकाऱ्यांनी यापूर्वी देशाच्या आधारावर भेदभाव होणार नाही, असे संकेत दिले होते. तरीही सध्याच्या निर्णयामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली असून खेळ आणि राजकारण पुन्हा एकदा समोरासमोर आल्याचे चित्र आहे.






