Nitesh Rane | राज्यात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण रंगत असताना, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी एक महत्त्वाचा प्रस्ताव पुढे मांडला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून २५ ऑगस्ट हा दिवस ‘वराह जयंती उत्सव दिन’ म्हणून घोषित करावा अशी मागणी केली आहे. हिंदू समाजात या जयंतीबद्दल प्रचंड आदरभाव असल्याने ती राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी व्हावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
हिंदू धर्मातील वराह देवाचं महत्त्व :
हिंदू धर्मातील दशावतारांपैकी तिसरा अवतार म्हणजे वराह अवतार मानला जातो. वराह देवाला वसुंधरेचा संवर्धक आणि दुष्ट प्रवृत्तींचा नाश करणारा म्हणून ओळखलं जातं. राणे यांनी पत्रात नमूद केलं आहे की, वराह भगवानाच्या पूजनानं पर्यावरण संवर्धन, धर्म, सदाचार आणि सामाजिक जागृतीची भावना बळकट होते.
२५ ऑगस्ट रोजी येणारी वराह जयंती धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाची असल्याने शासनाने अधिकृत अधिसूचना काढून उत्सव आयोजित करावा, अशी त्यांची मागणी आहे.
Nitesh Rane | पत्रातील चार ठळक मागण्या :
– २५ ऑगस्ट (भाद्रपद शुद्ध द्वितीया) हा दिवस राज्यभर ‘वराह जयंती उत्सव दिन’ म्हणून घोषित करावा.
– जिल्हा पातळी व प्रमुख शहरांमध्ये शासनामार्फत सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करावेत.
– शाळा व महाविद्यालयांमध्ये वराह भगवानाचा इतिहास व संदेश यावर व्याख्याने आयोजित करावीत.
– मंदिरांमध्ये विशेष पूजा-अर्चा व भक्ति कार्यक्रम आयोजित करावेत.
या प्रस्तावानंतर राज्यातील राजकारणातही चांगलाच गदारोळ उडाला आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी खोचक टिप्पणी करत म्हटलं – “वराह जयंती वराह अवतारातच साजरी करावी.”
या वक्तव्यामुळे सण-उत्सवाच्या मागणीवरून सुरू झालेली चर्चा आता राजकीय रंग घेऊ लागली आहे.






