Mumbai News | ॲप-आधारित कॅब सेवा बुक केल्यानंतर चालकाने ऐनवेळी बुकिंग रद्द करण्याच्या प्रकारांमुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांसाठी आता दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारने (State Government) नुकत्याच मंजूर केलेल्या नवीन कॅब एग्रिगेटर धोरणानुसार, आता चालकाने विनाकारण बुकिंग रद्द केल्यास संबंधित कंपनीला प्रवाशाला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. यामुळे चालकांच्या मनमानीला चाप बसेल अशी अपेक्षा आहे.
चालकांच्या मनमानीला चाप; प्रवाशांना दिलासा-
अनेकदा (Mumbai News) प्रवासी कॅब बुक करतात आणि चालक ते बुकिंग स्वीकारतो, मात्र काही वेळातच चालक स्वतःहून ते रद्द करतो. यामुळे प्रवाशांना केवळ मनस्तापच सहन करावा लागत नाही, तर त्यांना वेळेवर पोहोचण्यास उशीर होतो आणि कधीकधी जास्त दराने दुसरी गाडी बुक करावी लागते. प्रवाशांच्या या त्रासाची दखल घेत राज्य सरकारने ‘सुधारित वाहन समुच्चयक (कॅब एग्रिगेटर) धोरण’ मंजूर केले आहे.
या नवीन धोरणातील तरतुदीनुसार, आता ओला (Ola), उबेर (Uber), रॅपिडो (Rapido) यांसारख्या कंपन्यांशी संलग्न असलेल्या चालकाने, प्रवाशाची कोणतीही चूक नसताना, स्वीकारलेले बुकिंग रद्द केल्यास, त्या प्रवाशाला संबंधित कॅब कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. पूर्वी अशा प्रकरणांमध्ये प्रवाशांना कोणताही दिलासा मिळत नव्हता.
निश्चित दंडप्रणाली आणि धोरणाचे उद्दिष्ट-
नवीन (Mumbai News) नियमांनुसार नुकसान भरपाईची रक्कम देखील निश्चित करण्यात आली आहे. जर चालकाने प्रवाशाच्या कारणाशिवाय बुकिंग रद्द केले, तर कॅब कंपनीला प्रवाशाला त्या प्रवासाच्या एकूण भाड्याच्या १० टक्के रक्कम भरपाई म्हणून द्यावी लागेल. ही रक्कम कमीत कमी ५० रुपये आणि जास्तीत जास्त ७५ रुपये असेल. ही तरतूद प्रवाशांना होणारा आर्थिक भुर्दंड आणि त्रासापासून वाचवण्यासाठी करण्यात आली आहे.
या धोरणामुळे कॅब सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आणि त्यांच्या चालकांमध्ये बुकिंग आणि रद्द करण्याच्या प्रक्रियेबद्दल एक प्रकारची शिस्त (discipline) निर्माण होण्याची अपेक्षा आहे. तसेच, यामुळे प्रवाशांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना अधिक चांगली सेवा मिळण्यास मदत होईल.






