Mumbai Plane Crash Risk | अहमदाबादमधील विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे. या भीषण दुर्घटनेनंतर मुंबईतील संभाव्य धोका अधोरेखित करत आमदार दिलीप लांडे (Dilip Mande) यांनी एक गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, “अहमदाबादसारखी घटना मुंबईच्या कुर्ला बैल बाजार झोपडपट्टी परिसरात घडली तर प्रचंड जीवितहानी होऊ शकते.”
मुंबईच्या विमानतळाच्या अत्यंत जवळ मोठ्या झोपडपट्ट्यांचा विस्तार आहे. अनेक विमानं कमी उंचीवरून उड्डाण करतात किंवा लँडिंग करतात. त्यामुळे जर विमानातील कोणतीही तांत्रिक बिघाडाची घटना येथे घडली, तर तिचं रूपांतर थेट विनाशात होण्याची शक्यता आहे. आमदार लांडे यांनी या भागातील तत्काळ पुनर्वसन व हटवणूक करण्याची मागणी केली आहे. (Mumbai Plane Crash Risk)
विधानसभेत घेतला होता मुद्दा, आता मुख्यमंत्र्यांना देणार पत्र :
दिलीप लांडे यांनी सांगितलं की, “हा मुद्दा मी विधानसभेत उपस्थित केला होता. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं होतं.” आता त्यांनी या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) आणि उपमुख्यमंत्री शिंदे (Eknath shinde) यांना औपचारिक पत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, जर अहमदाबादप्रमाणे मुंबईत अशी दुर्घटना घडली, तर केवळ प्रवासी नव्हे तर हजारो झोपडपट्टीत राहणाऱ्यांचे प्राण संकटात येतील. त्यामुळे ही बाब हलक्याच घेण्यात येऊ नये, असं ते म्हणाले.
Mumbai Plane Crash Risk | मृत पायलट सुमित सभरवाल यांच्याही कुटुंबीयांची भेट :
अहमदाबाद दुर्घटनेत पवईमध्ये राहणारे पायलट सुमित सभरवाल यांचाही मृत्यू झाला. आमदार दिलीप लांडे यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि संवेदना व्यक्त केल्या. या भेटीदरम्यानच त्यांनी झोपडपट्टी हटवण्याची मागणी प्रसारमाध्यमांसमोर मांडली.
अशा दुर्घटना टाळण्यासाठी विमानतळांच्या आजूबाजूचे परिसर सुरक्षित ठेवणं अत्यावश्यक आहे. हे लक्षात घेत राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने पावलं उचलावीत, अशी जोरदार मागणी त्यांनी पुन्हा केली आहे.






