Mumbai-Goa Highway | गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना कोकणात जाण्यासाठी सुरू झालेली लगबग अधिक वाढली आहे. 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो चाकरमानी मुंबई, ठाणे, पालघर येथून कोकणातील गावी जाणार आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर जड वाहनांना तात्पुरती बंदी लागू करण्यात आली आहे. हा निर्णय प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी घेण्यात आला आहे. गणपती काळात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या या मार्गावर हलक्या वाहनांना प्राधान्य दिले जाणार आहे. (Mumbai-Goa Highway Traffic Change )
अवजड वाहनांवर तात्पुरती बंदी :
गणेशोत्सव काळात 16 टनांपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांना मुंबई-गोवा महामार्गावर बंदी घालण्यात आली आहे. 23 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ही बंदी लागू होणार असून 28 ऑगस्ट रात्री 11 वाजेपर्यंत ती सुरू राहणार आहे. याशिवाय 31 ऑगस्ट, 2 सप्टेंबर आणि 6 ते 7 सप्टेंबर या तारखांनाही ही बंदी कायम राहील.
जीवनावश्यक वस्तू, औषधे, दूध, गॅस, नाशवंत माल तसेच आयात-निर्यात माल घेऊन जाणाऱ्या वाहनांना मात्र यामध्ये सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आवश्यक सेवांचा पुरवठा कोणत्याही अडथळ्याविना सुरू राहील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Mumbai-Goa Highway | प्रवासात होणार उशीर, दुरावस्थेचा फटका :
मुंबई-गोवा महामार्गावरील वडखळ ते माणगाव दरम्यान रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे या काळात प्रवासाचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. साधारणतः 10 ते 11 तासांचा प्रवास आता 15 ते 20 तास लागू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. (Mumbai-Goa Highway Traffic Change )
प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी महामार्गावर ठिकठिकाणी पाणी, खाण्याचे पदार्थ आणि आवश्यक वस्तूंचे स्टॉल उभारले जाणार आहेत. त्यामुळे दीर्घ प्रवासात येणारा त्रास काही प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा आहे.






