MPSC | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. आता उमेदवारांनी केलेल्या दाव्यांची पडताळणी मुलाखतीच्या वेळी नव्हे, तर त्याआधीच केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना त्यांच्या दाव्यानुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड (MPSC Document Upload) केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय आयोगाने घेतला आहे. (MPSC Application Process)
आयोगाने यासंदर्भात अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. यानुसार, विविध पदभरती परीक्षांसाठी उमेदवारांची पात्रता तपासल्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांनी संबंधित पुरावे ऑनलाइन प्रणालीद्वारे अपलोड करणे आवश्यक आहे. यासाठी आयोगाने सुमारे 20 प्रकारच्या कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे.
काय कागदपत्रे करावी लागतील अपलोड? :
MPSC च्या नव्या परिपत्रकानुसार, उमेदवारांनी त्यांच्या दाव्यानुसार संबंधित पुरावे सादर करणे अनिवार्य आहे. यामध्ये भूकंपग्रस्त, खेळाडू, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग, आर्थिक दुर्बल घटक, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त आणि अंशकालीन कर्मचारी अशा दाव्यांचा समावेश आहे. या सर्वांसाठी संबंधित प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. (MPSC Document Upload)
याशिवाय नाव, वय, शैक्षणिक पात्रता, अधिवास (डोमासाइल), अनुभव प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि मराठी भाषेचे प्रमाणपत्र ही कागदपत्रेही अनिवार्य करण्यात आली आहेत. उमेदवारांनी अर्ज करताना ही सर्व प्रमाणपत्रे वैध स्वरूपात अपलोड केली नाहीत, तर त्यांचा अर्ज अपूर्ण समजला जाईल.
MPSC | कागदपत्रे अपलोड न केल्यास काय होईल? :
जर कोणत्याही उमेदवाराने वैध कागदपत्रे अपलोड केली नाहीत, तर त्याला आयोगाकडून फक्त एकच अतिरिक्त संधी दिली जाईल. या कालावधीत उमेदवाराने सात दिवसांच्या आत आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे. या संदर्भात उमेदवारांना SMS, ई-मेल आणि MPSC संकेतस्थळावरील अधिसूचनाद्वारे कळवले जाईल. (MPSC Application Process)
त्यानंतर वैध प्रमाणपत्रे सादर केलेल्या उमेदवारांच्या दाव्यांची पडताळणी आयोगाकडून पूर्वीप्रमाणेच केली जाईल. सर्व तपासणी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांच्या दाव्यांची अंतिम मान्यता देण्यात येईल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी त्यांना पात्र ठरवले जाईल.
MPSC चा निर्णय – पारदर्शकता आणि वेळेची बचत :
MPSC चा हा निर्णय अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेळेची बचत साधण्यासाठी घेतला गेल्याचे मानले जाते. पूर्वी मुलाखतीच्या टप्प्यावर कागदपत्रांच्या पडताळणीमुळे वेळ आणि तांत्रिक त्रुटी निर्माण होत होत्या.
मात्र, आता अर्जाच्या टप्प्यावरच पडताळणी झाल्याने प्रक्रिया अधिक सुलभ आणि काटेकोर होणार आहे.






