Maratha reservation protest | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू केलेले आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतरही, पोलिसांनी काल एक दिवसाची परवानगी दिली होती. मात्र आंदोलनाची मुदत वाढल्याने आजही जरांगे आझाद मैदानात उपोषणावर ठाम आहेत. “आमच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली असून हजारो मराठा समाज बांधव त्यांच्या समर्थनार्थ मुंबईत दाखल झाले आहेत.
BMC समोर रस्त्यावर ठिय्या :
आझाद मैदान परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे मैदानात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. झोपण्याची, बसण्याची, पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा नसल्याने आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या समोरच्या रस्त्यावर मराठा बांधवांनी ठिय्या सुरू केला आहे. “एक मराठा, लाख मराठा”च्या घोषणा देत आंदोलकांनी संपूर्ण रस्ता बंद केला आहे. परिणामी या भागात मोठी वाहतूक कोंडी झाली असून मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. (Maratha reservation protest)
“तोपर्यंत आम्ही हटणार नाही, जोपर्यंत आझाद मैदानात खडी टाकली जाणार नाही आणि बसण्याची नीट व्यवस्था केली जाणार नाही,” असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. खाण्यापिण्याची व सांडपाण्याची कोणतीही सोय नसल्याने आंदोलनकर्त्यांचा संताप वाढला आहे. “सरकारने जेवणाची दुकाने बंद ठेवली, पण वाईन शॉप मात्र सुरू ठेवली आहेत. आम्हाला दारूडे म्हणून बदनाम केले जात आहे,” असा आरोप आंदोलकांनी केला.
Maratha reservation protest | पोलिसांचा प्रयत्न, आंदोलकांचा निर्धार :
पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मनोज जरांगे पाटील यांनीसुद्धा आंदोलकांना शांततेने वागण्याचे आवाहन केले होते. (Maratha reservation protest)
मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. “सरकारने सोय केली नाही, तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही,” असा ठाम निर्धार त्यांनी पुन्हा व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील काही तासांत मुंबईतील वाहतूक व्यवस्था व कायदा-सुव्यवस्था यावर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.






