Sharad Pawar | लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. त्यानंतर लगेच राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. लोकसभेतील निकाल पाहता मविआमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग पाहायला मिळालं. मात्र, जसा विधानसभेचा निकाल लागला त्यानंतर मविआला जणू गळतीच लागल्याचं चित्र दिसून येतंय. गेल्या काही महिन्यात अनेक बड्या नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्याचं दिसून आलं. यात सर्वाधिक फटका हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाला (Sharad Pawar) बसला आहे.
काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात प्रवेश केला आहे. यामुळे कोकणात उद्धव ठाकरे यांना मोठा फटका बसलाय. अशात शरद पवार गटातही गळती दिसून येतेय.
‘हे’ बडे नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर?
मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव आणि श्रीगोंदामधील काही नेत्यांच्या अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. राजकीय वर्तुळात याबाबत तूफान चर्चा आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा येथून राहुल मोटे, तसेच श्रीगोंदा विधानसभेतील अपक्ष उमेदवार राहुल जगताप आणि परभणी मधील सेलू जिंतूर येथील विजय भांबळे हे शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
पुन्हा शरद पवार vs अजित पवार संघर्ष
मात्र, या नेत्यांना अजित पवारांच्या पक्षाअंतर्गतच काहीसा विरोध असल्याची माहिती आहे. ज्यांनी महायुती मित्र पक्षांच्या विरोधात निवडणूक लढवली, त्याच उमेदवारांना अजित पवार थेट पक्षात प्रवेश देणार असतील तर त्यामुळे महायुतीत नाराजीचा सुर उसळला आहे.
दुसरीकडे, अजित पवार गटाची यामुळे ताकद वाढणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवार विरुद्ध अजित पवार असा राजकीय संघर्ष पेटणार असल्याचं चित्र आहे. आता शरद पवार (Sharad Pawar) गटातील हे नेते राष्ट्रवादी (अजित पवार गटात) कधी प्रवेश करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.






