Weather Update | महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात अपेक्षित असलेली थंडी फारशी जाणवत नाही. काही दिवसांपूर्वी थंडीने सुरुवात झाली असली तरी सध्या राज्यभर उन्हाचा कडाका वाढताना दिसत आहे. बुधवारी अनेक भागात ढगाळ वातावरण कमी झाले आणि तापमानात जाणवण्याजोगी वाढ झाली. हवामान विभागानुसार, आज आणि उद्या राज्यात याच उष्णतेचा प्रभाव कायम राहणार आहे.
राज्यात सकाळ-संध्याकाळ थंडीची चाहूलदेखील कमी झाल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवत आहे. विदर्भाव्यतिरिक्त बाकीचा महाराष्ट्र दिवसाढवळ्या उष्णतेत काहील बनला आहे. तापमानातील वाढीमुळे रात्री उशिरापर्यंतही हवा उबदार राहतेय. दरम्यान, विदर्भात मात्र किमान तापमान घसरण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. (Maharashtra Weather Update)
विदर्भात तापमानात घट, राज्यात वाढ कायम :
बुधवारी भंडाऱ्यात तब्बल 12°C इतके राज्यातील सर्वात कमी तापमान नोंदले गेले. मात्र उर्वरित महाराष्ट्रात किमान तापमान 15°C च्या वर असून थंडी स्पष्टपणे ओसरलेली जाणवते. सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात 1 ते 4 अंश सेल्सिअस वाढ झाली आहे. कोकणातील भिरा येथे तर गेल्या 24 तासांत कमाल तापमान तब्बल 38°C पर्यंत पोहोचले असून नोव्हेंबर महिन्यातील ही उष्णता चिंतेची बाब मानली जाते.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज विदर्भात किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होऊ शकते. मात्र मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, पुणे आणि कोकणात तापमान वाढीचाच कल राहील. आकाश निरभ्र असल्याने पुढील दोन दिवस उकाडा वाढण्याची शक्यता अधिक आहे.
Weather Update | पुण्यात पहाटेचा गारठा, दिवसा उकाडा :
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने पुण्यात दिवसभर उबदार तापमान जाणवत असले तरी पहाटेच्या सुमारास हलका गारठाही अनुभवास येतो. तापमानात मोठी चढउतार नसली तरी सकाळ-संध्याकाळ गारावा आणि दुपारचा तडाखा या दोन्हींचा अनुभव मिळतो आहे. हे मिश्र हवामान 29 नोव्हेंबरपर्यंत कायम राहील, असे हवामान विभागाने नमूद केले आहे. (Pune Weather Update)
दरम्यान, राज्यातील हवामानात अचानक बदल घडवणारे मोठे कारण म्हणजे दक्षिणपूर्व आशियात तयार झालेले ‘सेनयार’ चक्रीवादळ. हे चक्रीवादळ मलेशियातील मल्लाका सामुद्रधुनी आणि ईशान्य इंडोनेशियाजवळ निर्माण झाले असून काही काळ वायव्येकडे सरकल्यानंतर आज पुन्हा पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे.
‘सेनयार’सोबतच बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. ही प्रणाली 28 नोव्हेंबरपर्यंत तमिळनाडू आणि पुडुच्चेरी किनारपट्टीकडे सरकू शकते. या दोन प्रणालींच्या परिणामामुळे महाराष्ट्रात थंड-उष्णतेचा अस्थिर पॅटर्न पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.






