Weather Alert | नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाली असली तरी राज्यभर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला असून पुढचे 24 तास अत्यंत धोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकं खराब झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. दैनंदिन जीवनावरही पावसाचा मोठा परिणाम होत असून, नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
मराठवाड्यात यलो अलर्ट; पुणेकरांना मिळाला दिलासा :
राज्यात रविवारी अनेक ठिकाणी पाऊस झाला असून, आज (सोमवार) देखील मराठवाड्यातील बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. राज्यातील इतर भागातही विजांच्या कडकडाटासह वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Maharashtra Weather Alert)
दरम्यान, पुण्यात गेल्या तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने रविवारी विश्रांती घेतली. हवामान खात्याने पुढील तीन दिवस पाऊस नसण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पावसाने हैराण झालेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
Weather Alert | थंडी लांबली; डेंग्यूचे रुग्ण वाढले :
नोव्हेंबर सुरू असूनही थंडीची चाहूल अजून लागलेली नाही. हवामान तज्ञांच्या मते, थंडीची सुरुवात 6 नोव्हेंबरनंतरच होणार आहे. तोपर्यंत राज्यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू राहील. 6 ते 8 नोव्हेंबरदरम्यान वातावरण कोरडे होऊन थंडी वाढेल असा अंदाज आहे.
दरम्यान, राज्यात डेंग्यू रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत 9,728 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळले असले तरी मृत्यूदर घटल्याने दिलासा मिळाला आहे. आरोग्य विभागाने डेंग्यू नियंत्रण मोहिमेला गती दिली असून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






