Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रात हवामानात मोठे बदल होत असून काही ठिकाणी तीव्र उष्णता तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने 22 आणि 23 मार्च रोजी 8 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. कोकणातील काही भागांत उष्णतेची लाट जाणवणार असून काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. (Maharashtra Weather Alert )
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा
देशभरात हवामान वेगाने बदलत असून महाराष्ट्रातही त्याचा परिणाम जाणवत आहे. दक्षिणेकडून पश्चिम बंगालच्या खाडीत आणि गुजरातच्या दिशेने तीन सायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय झाल्यामुळे हवामान अस्थिर झाले आहे. याचा प्रभाव महाराष्ट्रावरही दिसून येत असून काही भागांत पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की, राज्यातील काही भागांत 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. सोबतच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट असून पुढील काही दिवस उन्हाचा तडाखा अधिक जाणवणार आहे.
कोकणात तीव्र उष्णता, विदर्भात पावसाचा इशारा
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता अधिक जाणवणार आहे. येथे पुढील काही दिवस तापमान वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
दुसरीकडे, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे.
‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
हवामान विभागाने बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या 8 जिल्ह्यांसाठी 22-23 मार्च रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. या भागांत जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे शेतीचे नुकसान होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Title : Maharashtra Weather Alert Heavy Rain and Heatwave






