Weather Update | राज्यात काही दिवसांपासून अचानक वाढलेल्या गारठ्याने सर्वत्र कडाक्याची थंडी जाणवत आहे. उत्तर भारतातून सतत येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात वेगवान घट झाली आहे. यामध्येच भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासह अनेक राज्यांसाठी मोठा इशारा दिला आहे. पुढील 24 तास धोकादायक ठरू शकतात, असा इशारा देत 19 आणि 20 नोव्हेंबरला थंडीच्या तीव्र लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Weather Alert)
उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब (Punjab), उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या राज्यामध्ये थंडीची परिस्थिती अधिकच तीव्र होत असून, थंडीच्या लाटेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रालाही या लाटेचा फटका बसण्याची शक्यता असून, अनेक भागांमध्ये पारा 10 अंशांच्या खाली घसरत आहे. दुसरीकडे दक्षिण भारतातील केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथे अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आल्याने देश दोन भिन्न हवामान परिस्थितींचा सामना करत आहे.
राज्यात तापमानात मोठी घसरण; अनेक शहरांमध्ये पारा 10 अंशांच्या खाली :
गेल्या काही दिवसांपासून परभणी (Parbhani) आणि जेऊर येथे तापमान फक्त 7 अंश सेल्सिअसवर नोंदले गेले. जळगावात 7.1 अंश, निफाड 8.3 अंश, तर आहिल्यानगर 8.4 अंश सेल्सिअसपर्यंत पारा खाली आला. पुणे (Pune), मालेगाव, महाबळेश्वर, भंडारा (Bhandara), गोदिंया, यवतमाळ, वाशिम या भागांमध्येही किमान तापमान 10 अंशांच्या खाली घसरले आहे. महाराष्ट्रात पुढील काही दिवस थंडीची तीव्र लाट राहणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
गोंदिया जिल्ह्यात तर थंडीचा जोर सर्वाधिक जाणवत असून, मागील तीन-चार दिवसांपासून सकाळच्या वेळी दाट धुक्याने शहर झाकून गेले आहे. देवरी परिसरात दृष्यमानता काही मीटरवरही मर्यादित होत असल्याने रस्ते अंधारमय दिसत आहेत. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना धुक्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अचानक आलेल्या या कडाक्याच्या गारठ्याने नागरिकांनी उबदार कपड्यांचा आधार घेतला आहे.
Weather Update | मुंबईतील पारा घसरला; हंगामातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद :
हवामान खात्याच्या सांताक्रूझ केंद्रात मंगळवारी 17.4 अंश, तर कुलाबा केंद्रात 21.5 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. सांताक्रूझ येथील हे तापमान हंगामातील सर्वात कमी असून सरासरीपेक्षा तब्बल 3.8 अंशांनी कमी आहे. यापूर्वी 16 नोव्हेंबरला 17.8 अंश किमान तापमान नोंदले गेले होते. गेल्या काही दिवसांत मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानात मोठा चढ-उतार होत आहे.
जळगाव जिल्ह्यातही थंडीने विक्रम मोडला आहे. 18 नोव्हेंबरला पहाटे शहरातील तापमान 7.1 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येत 23 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. यापूर्वी 2022 मध्ये 7.4 अंश तापमान नोंदवले गेले होते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार डिसेंबर आणि जानेवारीमध्ये तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
पुण्यात कडाक्याची थंडी कायम; उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव वाढला :
पुणे (Pune Weather Alert) जिल्ह्यातही थंडीचा जोर कायम असून मंगळवारी शहराचे किमान तापमान 9.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले. ग्रामीण भागात हवेली येथे तापमान फक्त 6.9 अंशांवर आले आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढत असल्याने पुण्यातील गारठा आणखी जाणवू लागला आहे. पुढील काही दिवस किमान तापमान कमी राहणार असून किंचित वाढीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Maharashtra Weather Alert)
राज्यात अचानक वाढलेली थंडी, धुके आणि कमी झालेली दृष्यमानता लक्षात घेता वाहनधारकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी, विद्यार्थ्यांनी तसेच सकाळी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर करावा, असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.






