Sugar Price Hike | ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि साखर उद्योगासाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात साखरेच्या किमान बाजारभावात (MSP) वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्र सरकारकडे साखरेच्या एमएसपी वाढीसाठी औपचारिक शिफारस केल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या साखरेचा दर 3100 रुपये प्रति क्विंटल आहे. मात्र, हा दर वाढवून 4100 रुपये करण्याची मागणी राज्य सरकारच्या ऊस गाळप हंगाम धोरण बैठकीत करण्यात आली. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि साखर कारखानदारांना मोठा दिलासा मिळू शकतो. दरम्यान, राज्य सरकारने या संदर्भात 20 ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारला पत्रही पाठवल्याचं समजतं.
साखर उत्पादन वाढण्याची शक्यता :
भारतीय साखर आणि जैव-ऊर्जा उत्पादक संघटनेच्या माहितीनुसार 2025-26 या मार्केटिंग वर्षात देशातील साखर उत्पादनात मोठी वाढ अपेक्षित आहे. यंदा उत्पादन 34.9 दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत जाऊ शकते, तर मागील वर्षी हे प्रमाण 28 दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत मर्यादित होतं. नवीन साखर हंगामाची सुरुवात भारत 5 दशलक्ष मेट्रिक टनांच्या साठ्याने करणार असल्याचंही संघटनेने स्पष्ट केलं आहे.
देशातील साखरेच्या वाढत्या उत्पादनामुळे देशांतर्गत मागणी भागवून निर्यातीचं प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते.
Sugar Price Hike | भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश :
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. दरवर्षी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली जाते. त्यामुळे देशात साखरेचं उत्पादन भरपूर होतं आणि निर्यातीतून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो.
मागील वर्षी काही भागात ऊस लागवड कमी झाल्याने उत्पादनात घट झाली होती, मात्र यंदा पावसाचं प्रमाण आणि लागवड दोन्ही चांगलं झाल्याने उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार साखरेच्या किमान बाजारभावात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.






