Rain Update | राज्यात मागील काही दिवसांपासून दमदार पावसानंतर आता हवामानात थोडा स्थैर्याचा टप्पा दिसून येत आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र निवळल्यामुळे राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. IMD अर्थात हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी दिलेले अंदाज राज्यवासीयांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. (Maharashtra Rain Update)
पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस विदर्भ वगळता इतर भागांत हलक्यापासून मध्यम सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. १५ जुलैपर्यंत पावसाचा जोर कमी राहील. यामुळे शेती आणि पर्यटन क्षेत्रात थोडा ब्रेक लागण्याची शक्यता आहे, परंतु धरणांमध्ये आधीच झालेल्या पावसामुळे जलसाठ्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.
घाटमाथ्यावर मध्यम पाऊस, पुणे, कोकण व विदर्भात बदलते वातावरण :
१२ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील घाट विभागात पावसाच्या मध्यम सरी पडणार आहेत. कोकण, गोवा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी वर्तवण्यात आल्या आहेत. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही काही भागांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Maharashtra Rain Alert)
विशेषतः जालना, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह झडपावसाचे सत्र होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Rain Update | नाशिक, मुंबईत दमदार पावसाची तयारी; पुण्यात ब्रेक :
मुंबईत शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. उपनगरात तुरळक पावसाची नोंद झाली असून, काही भागांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याउलट पुणे शहरात आज पावसाने ब्रेक घेतला असून, जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसामुळे धरणांत समाधानकारक जलसाठा आहे.
पुण्याच्या खेड तालुक्यात झालेल्या पावसामुळे आंबेगाव आणि खेड तालुक्याला वरदान ठरलेल्या इंदिरा पाझर तलावाची पातळी 100 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे आगामी काही आठवड्यांसाठी पाणीटंचाईचा धोका टळला आहे.






