Rain Alert | राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून विविध जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या स्तराचे इशारे जारी करण्यात आले आहेत. हवामान विभागाने (India Meteorological Department) कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही भागांमध्ये पुढील काही दिवस विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. काही ठिकाणी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट लागू करण्यात आल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
नाशिकवरील धोका कमी, अहिल्यानगरकडे पावसाचा मोर्चा :
महाराष्ट्रातील हवामानात झपाट्याने बदल होत असून गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. नाशिक (Nashik) शहर आणि त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) परिसरात ढगफुटीसदृश पावसाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, हवामानातील नव्या घडामोडींमुळे नाशिकवरील संभाव्य अतिवृष्टीचा धोका सध्या कमी झाल्याचे समोर आले आहे.
पालघर (Palghar) जिल्ह्यात तब्बल 450 मिमी पाऊस पाडणारा तीव्र हवेचा भोवरा (Vortex) नाशिकच्या दिशेने येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, या प्रणालीने मार्ग बदलल्याने नाशिकला मोठा दिलासा मिळाला. आता हा व्होर्टेक्स उत्तर दिशेला सुरत (Surat) परिसराकडे आणि दक्षिणेकडे अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील अकोले (Akole) भागाकडे सरकल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे नाशिकमधील मोठा धोका कमी झाला असला तरी अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा धोका वाढला आहे.
Rain Alert | अनेक जिल्ह्यांना अलर्ट; पुढील तीन दिवस महत्त्वाचे :
आजच्या हवामान अंदाजानुसार पालघर, नाशिक घाटमाथा आणि पुणे (Pune) घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी ढगफुटीसदृश अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नंदुरबार (Nandurbar), नाशिक, ठाणे (Thane), रायगड (Raigad), सातारा (Satara) घाटमाथा, बुलढाणा (Buldhana), अकोला (Akola) आणि अमरावती (Amravati) जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे. तर मुंबई (Mumbai), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg), कोल्हापूर (Kolhapur) घाटमाथा, धुळे (Dhule), अहिल्यानगर, जळगाव (Jalgaon), वाशिम (Washim), वर्धा (Wardha) आणि नागपूर (Nagpur) जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला असून उर्वरित भागात हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
पुढील तीन दिवसांच्या अंदाजात बुधवारी पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे. नाशिक, कोल्हापूर घाटमाथा, रायगड, रत्नागिरी, बुलढाणा, अकोला आणि अमरावती येथे येलो अलर्ट राहील. गुरुवारी पुणे, सातारा घाटमाथा, रत्नागिरी, यवतमाळ (Yavatmal), चंद्रपूर (Chandrapur) आणि गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.






