Dhanashri Kadgaonkar | मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) पुणे (Pune)मुंबई (Mumbai) द्रुतगती मार्गावर निर्माण झालेल्या वाहतुकीच्या प्रचंड कोंडीचा फटका अनेक प्रवाशांना बसला. या अडचणीत प्रसिद्ध मराठी अभिनेत्री धनश्री काडगांवकर (Dhanashri Kadgaonkar) यांनाही तब्बल नऊ तास महामार्गावर अडकून राहावे लागले. या काळात त्यांना मासिक पाळी सुरू झाल्याने परिस्थिती आणखी कठीण बनली. संपूर्ण अनुभव त्यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्टद्वारे मांडला आहे.
नऊ तासांची कोंडी, वाढलेल्या अडचणी :
सततच्या मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गासह जुना मुंबई-पुणे महामार्ग अनेक ठिकाणी दरड कोसळणे आणि पाणी साचल्याने विस्कळीत झाला होता. विशेषतः यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग (Yashwantrao Chavan Expressway) येथील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्यामुळे सोमवारी सकाळपासूनच वाहतुकीचा वेग पूर्णपणे मंदावला. परिणामी अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आणि हजारो प्रवाशांप्रमाणे धनश्री काडगांवकर यांची गाडीही या कोंडीत अडकून पडली.
या संपूर्ण प्रवासादरम्यान त्यांना मासिक पाळी सुरू झाली होती. मात्र वाहन पुढे सरकत नसल्यामुळे वॉशरूमपर्यंत जाण्याची कोणतीही शक्यता नव्हती. इतकेच नव्हे तर फूड कोर्टवर उतरून काही खाण्याची इच्छाही पूर्ण करता आली नाही. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचा त्रास सहन करावा लागल्याचे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केले. या प्रसंगाचा व्हिडिओदेखील त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
Dhanashri Kadgaonkar | शूटिंगसाठी घेतलेला निर्णय :
आपल्या पोस्टमध्ये धनश्री यांनी सांगितले की, यापूर्वी त्या अशा घटनांच्या केवळ बातम्या पाहायच्या, मात्र 6 जुलै 2026 रोजी स्वतःच अशाच प्रसंगाचा भाग बनल्या. महामार्गावर गुडघाभर पाणी साचले होते. पावसात भिजल्यास आजारी पडण्याची भीती होती, कारण पुढील काही दिवस त्यांचे महत्त्वाचे शूटिंग नियोजित होते. परिस्थिती पाहून चालकाने पुण्याला परत जाण्याचा सल्लाही दिला होता.
तरीही कलाकार म्हणून दिलेल्या कामाच्या बांधिलकीमुळे त्यांनी परतीचा निर्णय घेतला नाही. मालिका प्रसारणाचे वेळापत्रक विस्कळीत होऊ नये म्हणून त्यांनी संयम राखत प्रवास सुरू ठेवला आणि अखेर अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर सुरक्षितपणे शूटिंगच्या ठिकाणी पोहोचल्या. निसर्गापुढे माणसाचे काही चालत नाही, मात्र कोणालाही अशा संकटाचा सामना करावा लागू नये, अशी प्रार्थना त्यांनी पोस्टच्या शेवटी व्यक्त केली. त्यांच्या या अनुभवावर सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी सहानुभूती व्यक्त करत विविध प्रतिक्रिया नोंदवल्या.






