Maharashtra Rain Alert | महाराष्ट्रात जुलैच्या अखेरच्या आठवड्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) 27 जुलैसाठी राज्यातील विविध भागांना पावसाचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिजोरदार सरींची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाची स्थिती लक्षात घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकणासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर :
उत्तर-पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये तसेच पश्चिम बंगालच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या हवामान प्रणालीचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता असून राज्यातील पावसाची तीव्रता वाढू शकते. 27 जुलैला कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे पावसाची शक्यता आहे. यापैकी ठाणे, मुंबई आणि सिंधुदुर्गसाठी यलो अलर्ट देण्यात आला असून रायगड आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकणातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाबरोबरच विजांचा कडकडाट आणि वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरज नसल्यास नागरिकांनी प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
Maharashtra Rain Alert | मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा इशारा :
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुणे आणि सातारा घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून कोल्हापूरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. घाट परिसरात मुसळधार पाऊस होऊ शकतो. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना आवश्यक पाणी मिळण्यास मदत होण्याची शक्यता असून शेतीसाठी हा पाऊस दिलासादायक ठरू शकतो.
मराठवाड्यातही काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. बीड आणि परभणीमध्येही हलक्या सरींचा अंदाज आहे. दुसरीकडे, विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.





