Narendra Modi | बॉलिवूड अभिनेते सुदेश बेरी (Sudesh Berry) यांनी एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. मुलाखतीदरम्यान त्यांनी मोदींचे कौतुक करत त्यांना भगवान विष्णूचा अवतार असल्याचे म्हटले. तसेच त्यांना भेटण्याची संधी मिळाल्यास त्यांच्या पायांचे पाणी पिण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले. याचवेळी त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीवरही जोरदार टीका केली.
सीजेपीवर टीका, आंदोलनावरही प्रश्नचिन्ह :
सुदेश बेरी यांनी जंतर-मंतर (Jantar Mantar) येथे आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीवर निशाणा साधला. या आंदोलनामुळे देशाची प्रगती होत नसून देश मागे जात असल्याचा दावा त्यांनी केला. संबंधित पक्षाचे नावदेखील आपल्याला नीट माहिती नसल्याचे सांगत त्यांनी, देशासाठी सकारात्मक काम करण्याऐवजी आंदोलनाच्या माध्यमातून वेळ वाया घालवला जात असल्याची टीका केली.
यापुढे त्यांनी पक्षाच्या नावावरही टोला लगावत, समाजासाठी खरोखर काही करायचे असेल तर मुलांसाठी उद्याने उभारावीत, वृद्धांसाठी वृद्धाश्रम सुरू करावेत आणि गरजूंच्या उपचारासाठी काम करावे, असे मत व्यक्त केले. केवळ आंदोलन करून किंवा जंतर-मंतरवर बसून समाजाचे प्रश्न सुटत नाहीत, असे सांगत त्यांनी सीजेपीवर अप्रत्यक्षपणे टीकेची झोड उठवली.
Narendra Modi | मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक, रामराज्याचाही उल्लेख :
सुदेश बेरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचेही जोरदार समर्थन केले. मोदींनी देशासाठी मोठे योगदान दिले असून त्यांच्याविषयी आपल्याला अपार आदर असल्याचे ते म्हणाले. मुलाखतीत त्यांना पूर्वी आईचे चरण धुवून त्यांचे पाणी पिल्याचा प्रसंग आठवून दिल्यानंतर, संधी मिळाल्यास मोदींचेही पाय धुवून ते पाणी पिण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. आपण त्यांना कधी भेटलो नसल्याचे नमूद करत, जसे ईश्वराला न पाहताही लोक श्रद्धा ठेवतात, त्याचप्रमाणे आपणही मोदींचा सन्मान करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच देशात रामराज्य आल्याचाही दावा देखील केला आहे. त्याबाबत विचारणा झाल्यावर, हा अनुभव शब्दांत सांगता येणार नाही, तो केवळ जाणवण्याचा विषय असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्या या विधानांमुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, राजकीय वर्तुळातही या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.






