Maharashtra Leopard Attacks | महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. ग्रामीण भागांपासून शहरांच्या बाहेरच्या वसाहतीपर्यंत बिबट्यांचा वावर वाढल्याने ही परिस्थिती केवळ वन विभागापुरती मर्यादित न राहता संपूर्ण राज्यासाठी गंभीर धोक्याची ठरत आहे. अनेक ठिकाणी बिबट्यांनी माणसांवर आणि जनावरांवर हल्ले करून जीवितहानीही घडवली आहे. (Maharashtra Leopard Attacks
परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने राज्य सरकारलाही त्वरित उपाययोजना करावी लागत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी तातडीची उच्चस्तरीय बैठक घेऊन बिबट्यांच्या हल्ल्यांना ‘राज्य आपत्ती’ घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे बिबट्यांच्या दहशतीवर नियंत्रण आणण्यासाठी युद्धपातळीवर कारवाई शक्य होणार आहे.
शेड्यूल-1 मधून वगळून कठोर कारवाईचा मार्ग मोकळा :
राज्यातील बिबट्या हल्ल्यांवर अंकुश आणण्यासाठी सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत बिबट्यांना शेड्यूल-1 मधून वगळून शेड्यूल-2 मध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बदलामुळे धोकादायक ठरलेल्या बिबट्यांवर त्वरित कारवाई करणे अधिक सुलभ होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्यामुळे कठोर आणि धाडसी निर्णय घेणे आवश्यक आहे. बिबट्यांचे वाढते हल्ले रोखण्यासाठी आणि प्रभावित भागातील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी सरकारकडून आवश्यक ती सर्व पावले उचलली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Maharashtra Leopard Attacks | ड्रोन स्कॅनिंग, रेस्क्यू सेंटर आणि नसबंदी प्रक्रिया :
बिबट्यांची हालचाल ट्रॅक करण्यासाठी सरकारने ड्रोन स्कॅनिंगचा वापर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वस्तीत फिरणाऱ्या बिबट्यांचे लोकेशन तातडीने मिळावे आणि त्यांना सुरक्षितरीत्या पकडता यावे यासाठी ही अत्याधुनिक पद्धत वापरण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात पुढील दोन ते तीन महिन्यांत दोन नवीन रेस्क्यू सेंटर सुरू करण्याचाही निर्णय घेतला आहे.
तसेच, बिबट्या पकडण्यासाठी अतिरिक्त पिंजरे उपलब्ध करून दिले जाणार असून रेस्क्यू टीमची संख्या दुप्पट केली जाणार आहे. केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर नरभक्षी बिबट्यांची नसबंदी करण्याचाही निर्णय आहे, ज्यामुळे त्यांची हिंसक प्रवृत्ती नियंत्रणात आणणे शक्य होईल. सरकारकडून ही योजना युद्धपातळीवर राबवण्याची तयारी आहे.
शाळांच्या वेळात बदल आणि जंगलात शिकार उपलब्धतेवर भर :
बिबट्यांच्या हालचाली सकाळी लवकर आणि संध्याकाळी वाढत असल्याने मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रभावित भागातील शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक ठिकाणी मुलांना शाळेत नेण्यास पालकांना भीती वाटत असल्याने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. (Maharashtra Leopard Attacks)
दरम्यान, वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबट्यांच्या मानवी वस्त्यांवरील हल्ल्यांचे एक महत्त्वाचे कारण स्पष्ट केले आहे. जंगलात शिकार कमी झाल्याने बिबटे अन्नाच्या शोधात वस्त्यांमध्ये घुसत आहेत. त्यामुळे जंगल परिसरात बकऱ्यांसारखे प्राणी सोडून बिबट्यांना जंगलातच शिकार मिळेल यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. स्थानिक आमदारांनीही ही परिस्थिती तातडीने नियंत्रणात आणण्याची मागणी केली आहे.






