Government Employees | महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. सरकारी नोकरीतील स्थिरता, सुरक्षा आणि आकर्षक सुविधा यामुळे अनेक जण या नोकरीकडे वळतात. पगार, भत्ते आणि आरोग्यविषयक सुविधांसोबतच, कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याकडेही शासन विशेष लक्ष देत आहे. याचाच एक भाग म्हणून, सरकारी कर्मचाऱ्यांना ध्यान-धारणा करण्यासाठी पगारी रजा देण्याची विशेष सुविधा उपलब्ध आहे.
राज्य सरकारच्या वित्त विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, महाराष्ट्रातील सर्व विभागातील सरकारी कर्मचारी वर्षातून एकदा ‘विपश्यना ध्यान शिबिरा’साठी (Vipassana Meditation) 10 दिवसांची विशेष पगारी रजा घेऊ शकतात. कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार करून देण्यात आलेली ही सुविधा अनेकांना उपयोगी ठरत आहे. कामाचा वाढता ताण, जबाबदाऱ्या आणि दैनंदिन धकाधकीतून सुटका मिळवण्यासाठी ही रजा मोठी मदत ठरते.
विपश्यना शिबिरासाठी 10 दिवसांची पगारी रजा :
या नियमांनुसार, राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदा ही रजा घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. धम्मगिरी, इगतपुरी (नाशिक) येथील विपश्यना रिसर्च इन्स्टिट्युट येथे आयोजित करण्यात येणाऱ्या 10 दिवसांच्या शिबिरासाठी ही रजा लागू आहे. या रजेचा उद्देश कर्मचारी तणावमुक्त राहावेत, मानसिक स्वास्थ्य वाढावे आणि प्रशासनातील कार्यक्षमता सुधारावी हा आहे.
विशेष म्हणजे, ही रजा घेण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. मात्र, रजा अर्जासोबत विपश्यना केंद्राने दिलेल्या प्रवेशपत्राची प्रत जोडणे अनिवार्य आहे. या रजेला ‘अनुज्ञेय रजा’ मानले जाते. म्हणजेच ही रजा हक्काची नसून मंजुरी आवश्यक असते.
Government Employees | तीन वर्षांत एकदाच संधी, संपूर्ण सेवेत ६ वेळा मर्यादा :
या विशेष रजेची किमान मुदत 10 दिवस आणि कमाल 14 दिवस इतकी आहे. शासनाच्या 27 जून 2003 रोजीच्या निर्णयानुसार, ही सुविधा मागील 22 वर्षांपासून लागू आहे. तथापि, तीन वर्षांत एकदाच ही रजा घेता येते आणि संपूर्ण सेवाकाळात जास्तीत जास्त सहा वेळा ही रजा मिळू शकते. त्यामुळे कर्मचारी नियोजन करूनच या शिबिरासाठी रजा मागू शकतात. (Maharashtra Government Employees News)
प्रशासनाच्या माहितीनुसार, या ध्यान शिबिरांमुळे कर्मचारी अधिक ऊर्जावान, शांत आणि लक्ष केंद्रित मनस्थितीत काम करतात. तणावमुक्त झाल्यानंतर कामाचा वेग आणि गुणवत्ताही वाढते. त्यामुळे शासनाने ही रजा लाभदायक असल्याचे स्पष्ट केले आहे. (Government Employees Vipassana Meditation Leave)
काही वर्षांपासून सरकारी कर्मचार्यांकडून या रजेबाबत मोठा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी या सुविधेचा लाभ घेत ध्यान-धारणेद्वारे मानसिक आरोग्यात सुधारणा साधली आहे. व्यस्त जीवनशैलीतून वेळ काढून मानसिक शांततेसाठी केलेला हा उपक्रम राज्य प्रशासनातील एक महत्त्वाचा निर्णय ठरला आहे.






