Uddhav Thackeray | राज्यात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानादरम्यान बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याचे आरोप अनेक ठिकाणी करण्यात येत आहेत. या आरोपांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदान सुरू असतानाच पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. (Uddhav Thackeray Controversy)
उद्धव ठाकरे यांच्या या पत्रकार परिषदेने राजकीय वातावरण अधिक तापले असून, त्यानंतर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेण्यास परवानगी होती का, असा थेट सवाल शेलार यांनी उपस्थित केल्याने आता उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद; परवानगी होती का? आशिष शेलारांचा सवाल :
आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले की, मतदान सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी होती का, याचा तपास व्हायला हवा. या पत्रकार परिषदेत राजकीय भाष्य करण्यात आलं का, हे देखील निवडणूक आयोगाने पाहावं, अशी मागणी त्यांनी केली. मतदानाच्या दिवशी अशा प्रकारे निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला का, असा सवालही शेलार यांनी उपस्थित केला. (Maharashtra Municipal Election 2026)
ते पुढे म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळीही याच प्रकारचे आरोप करण्यात आले होते आणि आताही तेच चित्र दिसत आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत फक्त ३० टक्के मतदान झालं असताना अशा प्रकारचा संभ्रम निर्माण करण्यामागचा उद्देश काय, असा प्रश्न त्यांनी विचारला. उद्धव ठाकरे सतत पत्रकार परिषद का घेतात, याकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यावं, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली.
Uddhav Thackeray | ‘हा प्रचाराचा भाग’; उद्धव ठाकरेंवर शेलारांचा घणाघात :
आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना पूर्णतः असत्य ठरवत, हा सगळा प्रचाराचा भाग असल्याचा आरोप केला. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन चुकीचा नरेटिव तयार केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळेच आपण पत्रकार परिषद घेत असल्याचं शेलार यांनी स्पष्ट केलं. (Uddhav Thackeray)
उद्धव ठाकरे यांनी केलेली विधाने ही बुद्धीतील हेराफेरी असून, कोणतीही चोरी किंवा गैरप्रकार झालेला नाही, असा दावा शेलार यांनी केला. ठाकरे बंधूंच्या पक्षावर टीका करताना त्यांनी तीव्र शब्दांत घणाघात केला असून, या आरोपांमुळे निवडणूक निकालाआधीच राजकीय संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचं चित्र आहे.






