Maharashtra Cabinet Decisions | राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली असून या बैठकीत तब्बल 19 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकरी, उद्योग, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि नागरी विकास या सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक बदल घडवणाऱ्या योजनांना हिरवा कंदील मिळाला आहे. तसेच अजित पवार यांनी पाठपुरावा केलेल्या तीन प्रस्तावांनाही आज मान्यता देण्यात आली आहे.
या बैठकीत नाबार्डमार्फत 15 हजार कोटी रुपयांचे दीर्घ मुदतीचे कर्ज जलसंपदा प्रकल्पांसाठी मंजूर करण्यात आले आहे. यामुळे 57 अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण होणार असून 193 प्रकल्पांच्या वितरण प्रणालीत सुधारणा केली जाणार आहे. परिणामी राज्यातील सुमारे 8 लाख हेक्टर शेती क्षेत्र सिंचनाखाली येणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विमानतळ, उद्योग आणि क्रीडा क्षेत्राला चालना :
पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय झाला असून भूसंपादन व अनुषांगिक कामांसाठी 6 हजार कोटी रुपयांच्या कर्जाला शासन हमी देणार आहे. तसेच कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी 12 हेक्टर 76 आर शासकीय जमीन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय बारामती क्रीडा संकुलासाठी 75 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. (Maharashtra Cabinet Decisions)
उद्योग क्षेत्रासाठी पुणे जिल्ह्यातील रत्नपुरी मळा येथे एमआयडीसीला 1,000 एकर जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नागपूर जिल्ह्यात कोल टू केमिकल प्रकल्पासाठीही जमीन देण्यात येणार आहे. यामुळे राज्यात गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढण्याची अपेक्षा आहे.
Maharashtra Cabinet Decisions | आरोग्य, शिक्षण आणि नागरी सुविधांमध्ये सुधारणा :
राज्यात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियान’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून गावपातळीवर आरोग्य सुधारणा घडवून आणण्यासाठी दरवर्षी 80 कोटी 75 लाख रुपयांची तरतूद केली जाणार आहे. शालेय शिक्षण क्षेत्रात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील बक्षिसांच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे.
तसेच, ई-मेलद्वारे नोटीस बजावण्यास कायदेशीर मान्यता, राज्यात 11 अपर जिल्हाधिकारी पदांची निर्मिती, सुधारित धान्य वितरण प्रणालीसाठी एकत्रित निविदा प्रक्रिया आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी धोरण 2026 लागू करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.






