Mahadev Munde Murder | व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात धक्कादायक तपशील समोर येत असून, वाल्मिक कराड (Walmik karad) याचा मुलगा श्री कराड (Shree Karad) आणि त्याचे साथीदार हे या खूनामागे असल्याचा आरोप विजयसिंह बांगर यांनी केला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शवविच्छेदन अहवालातील माहिती उघड केली असून, मृतदेहावर १५ ते १६ खोल जखमा झाल्याचे नमूद केले आहे. (Mahadev Munde Murder Case)
महादेव मुंडेंच्या पत्नीने आंदोलन पुकारल्यानंतर आणि मराठा नेते मनोज जरांगे यांच्या इशाऱ्यानंतर सरकारने अखेर एसआयटी गठीत केली. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही यासाठी पाठपुरावा केला होता.
क्रूरपणाची परिसीमा: पायावर, गालावर आणि अन्ननलिकेवर वार :
शवविच्छेदन अहवालानुसार, महादेव मुंडेंच्या शरीरावर खोल जखमा असून अत्यंत क्रूरपणे त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. विजयसिंह बांगर यांच्या म्हणण्यानुसार, श्री कराड आणि त्याचे साथीदार गोट्या गित्ते हे मुंडेंच्या मागावर होते. घरी परतत असताना त्यांची रेकी करून मारहाण करण्यात आली. (Mahadev Munde Murder)
मुंडे जागेवरच मरण पावले नसून, रेंगाळत असताना गालावर, नंतर अन्ननलिकेवर वार करण्यात आला. २० मिनिटांहून अधिक वेळ अमानुषपणे मारहाण झाली. इतकंच नव्हे तर त्यांच्या मानेवर घाव घालण्यात आले आणि मास तोडून नेल्याचा गंभीर आरोप बांगर यांनी केला.
Mahadev Munde Murder | पोलीसही संशयाच्या भोवऱ्यात; रास्ता रोकोचा इशारा :
बांगर यांनी असा दावा केला की, हत्या होत असताना काही पोलिसांनी दुर्लक्ष केले आणि त्यांचेही या प्रकरणात सहभाग असल्याची शक्यता आहे. मृतदेह तहसील कार्यालय परिसरात अज्ञात ठिकाणी फेकण्यात आला होता.
ते पुढे म्हणाले की, एसआयटीत आयपीएस अधिकारी नसल्याने चौकशीवर शंका निर्माण होत आहे. त्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी आणि आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी सरकारकडे त्यांनी मागणी केली. अन्यथा, २५ जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.






