Madhuri Elephant News | कोल्हापूरच्या नांदणी मठाची हत्तीण ‘माधुरी’ परत मिळवण्यासाठी स्थानिक पातळीवर सुरू झालेल्या मोहिमेला आता अधिकृत पाठिंबा मिळत असल्याचं चित्र दिसत आहे. वनतारा (Vantara) संस्थेचे सीईओ आणि नांदणी मठाचे मठाधीपती यांच्यात शुक्रवारी महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने आणि धनंजय महाडिक यांचीही उपस्थिती होती. (Madhuri Elephant News)
या बैठकीनंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “कोर्टाकडून आदेश मिळाले, तर वनतारामार्फत माधुरी हत्तीण मठात परत पाठवण्यात कोणताही अडथळा येणार नाही.” यासोबतच त्यांनी स्थानिक जनतेच्या भावना सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याची तयारीही दर्शवली.
“माधुरी” प्रकरणात वनताराची भूमिका नाही – CEO यांचा खुलासा :
वनताराचे CEO म्हणाले, “आम्ही कोणत्याही राजकीय किंवा वैयक्तिक कारणाने काम करत नाही. जे काही केलं ते फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केलं.” त्यामुळे जर न्यायालयाकडून निर्देश मिळाले, तर माधुरी हत्तीण परत पाठवण्यात आमचं संपूर्ण सहकार्य असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
त्यांनी पुढे सांगितले की, “नांदणी मठात हवं असल्यास वनताराचे एक युनिटही सुरू करण्याचा विचार करू शकतो. आमची यामध्ये भूमिका शून्य आहे आणि या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप नको.” स्थानिक लोकांमध्ये असलेल्या भावना आम्हाला समजतात, पण आमच्या संस्था कायदेशीर मर्यादांमध्येच काम करतात, असंही त्यांनी नमूद केलं.
Madhuri Elephant News | कायदेशीर लढाई सुरू करण्याचे संकेत; भावनेवर नाही तर कायद्यावर भर :
पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितलं, “सर्वोच्च न्यायालयात आपण कोल्हापूरकरांची भावना मांडू. मात्र, कोर्टाचा निर्णय फक्त भावना नव्हे तर कायदेशीर प्रक्रिया पाहून घेतला जातो.” त्यामुळे मठाच्या वतीने सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Madhuri Elephant News)
त्याचबरोबर, “जैन समाजाच्या भावना आम्ही समजतो, मात्र यावर राजकारण होऊ नये, असंही आबिटकर यांनी नमूद केलं. माधुरी हत्तीण केवळ एक प्राणी नसून अनेकांच्या श्रद्धेचा विषय आहे, त्यामुळे या प्रकरणात संयमाने आणि कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग काढणं गरजेचं आहे.






