Ladki Bahin Yojana | ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’ सातवा, जानेवारी महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली होती. जुलै महिन्यात घोषणा करण्यात आल्यानंतर राज्यातील 21 ते 60 वयोगटातील सुमारे दोन कोटी महिलांना आत्तापर्यंत दरमहा 1500 रुपये देण्यात आले. आता जानेवारीचा हप्ता जमा झाल्यानंतर पात्र महिलांना एकूण 10 हजार 500 रुपये मिळतील.
योजनेचा उद्देश आणि लाभार्थ्यांची संख्या-
‘लाडकी बहीण’ योजनेच्या (Ladki Bahin Yojana) माध्यमातून महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याचा सरकारचा हेतू आहे. या योजनेमुळे पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. मात्र, आता पात्र लाभार्थ्यांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. कारण या योजनेसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांची छाननी करण्यात येत आहे. निकषांत न बसणारे अर्ज योजनेतून वगळण्यात येऊ शकतात. इतर निकषांत न बसणाऱ्या महिलांचेही अर्ज छाननीमध्ये बाद होऊ शकतात, अशी चर्चा आहे.
योजनेबाबतच्या अदिती तटकरेंचे स्पष्टीकरण-
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana) योजनेची घोषणा करून महिलांचे अर्ज मंजूर केले. यातील काही अर्जांमध्ये त्रुटी असूनही पडताळणी न करता त्या महिलांना पैसे देण्यात आले. मात्र, आता निकालानंतर ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अर्जांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. तसेच, ज्या अर्जांमध्ये त्रुटी आहेत ते अर्ज बाद केले जातील, अशी चर्चा रंगली आहे.
त्यामुळे ज्या पात्र महिलांचे अर्ज बाद होतील, त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत, असे बोलले जात आहे. आता त्यावर अदिती तटकरे यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. “लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ज्या काही बातम्या वृत्तपत्रांतून येत आहेत त्या सर्व बातम्या चुकीच्या आहेत. ही हजारोंच्या संख्येने अर्ज आले आहेत.
त्या महिलांनी आवाहनानंतर आपली ‘लाडकी बहीण’ योजना सोडून दिली आहे. पण अजून आमच्या विभागाने किती महिला अपात्र होणार यासंदर्भात आकडेवारी जाहीर केली नाही आहे. त्यामुळे माध्यमांमध्ये येणाऱ्या सर्व बातम्या या खोट्या आहेत. माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून या बातम्यांवर जनतेने विश्वास ठेवू नये,” असे अदिती तटकरे म्हणाल्या.
2100 रुपये कधी मिळणार?
विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आलो तर लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 वरून 2100 करू असे आश्वासन नेत्यांनी दिले होते. मात्र, अद्याप लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात आहे. काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात एक महत्त्वाचे वक्तव्य केले होते.
मार्च महिन्यानंतरच लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बजेटमध्ये यावर विचार केला जाईल, असे सांगितले. त्यामुळे मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात योजनेत सुधारणा होण्याची शक्यता आहे.






