Ketan Agarwal Murder Case | पुण्यातील केतन अगरवाल कथित हत्याप्रकरणाच्या तपासात नवे आणि धक्कादायक वळण समोर आले आहे. लोहागड किल्ल्यावरील दरीत केतनला ढकलून ठार मारल्याचा आरोप असलेल्या सिया आणि तिचा कथित प्रियकर चेतन यांनी सुरुवातीला कट रचल्याची कबुली दिली होती. मात्र आता तपास पुढे सरकत असताना दोघांनीही प्रत्यक्ष धक्का कोणी दिला यावरून पोलिसांसमोरच एकमेकांवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील तपास अधिकच चर्चेत आला आहे.
पोलिस कोठडीत सुरू असलेल्या चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींना केतनला दरीत ढकलण्याच्या अंतिम क्षणाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी दोघांनीही स्वतःचा बचाव करण्यासाठी एकमेकांवर दोष टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांसमोरच दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.
अंतिम क्षणी नेमकं काय घडलं? दोघांचे वेगवेगळे दावे :
पोलिस माहितीनुसार, चेतनने चौकशीत दावा केला की, संपूर्ण नियोजन दोघांचे असले तरी केतनला दरीत ढकलण्याचा अंतिम धक्का सियानेच दिला. त्याच्या मते, सियानेच प्रत्यक्ष कृती करत केतनला दरीत लोटले.
मात्र सियाने हा आरोप फेटाळून लावत चेतनवरच गंभीर आरोप केले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण कटाची आखणी चेतनने केली होती आणि केतन निष्काळजी असताना त्यानेच मागून जोरदार धक्का देऊन त्याला दरीत ढकलले. त्यामुळे दोघेही प्रत्यक्ष हत्या कोणी केली याची जबाबदारी स्वीकारण्यास नकार देत असल्याचे तपासात समोर आले आहे.
Ketan Agarwal Murder Case | पोलिसांकडे भक्कम पुरावे असल्याचा दावा :
तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींनी केतनला संपवण्यासाठी कट रचल्याचे आधीच मान्य केले आहे. 18 जून रोजी लोहागडावर नेणे, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचा मोबाईल वापरणे आणि पुढील प्रवासापूर्वीच केतनला हटवण्याचे नियोजन केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
याशिवाय पोलिसांनी व्हॉट्सअॅप चॅट, लोकेशन आणि कॉल रेकॉर्ड्ससह विविध परिस्थितीजन्य पुरावे गोळा केल्याचा दावा केला आहे. तपासात दोघांच्या समान सहभागाचे संकेत मिळाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रत्यक्ष धक्का कोणी दिला यावरून आरोपी एकमेकांवर आरोप करत असले, तरी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे दोघांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू राहील आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.






