Indian Railway Luggage Rule | भारतीय रेल्वेने विमान कंपन्यांप्रमाणेच आता प्रवाशांच्या लगेजवर (Baggage) मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे. विमान प्रवासात जसं ठराविक वजनापेक्षा अधिक सामान नेल्यास अतिरिक्त शुल्क आकारलं जातं, तसंच रेल्वे प्रवासातही हा नियम काटेकोरपणे लागू होणार आहे. यामुळे प्रवाशांना ठराविक वजनाच्या मर्यादेचं पालन करणं बंधनकारक ठरणार आहे. (Indian Railway Luggage Rule)
यापूर्वीही अशा प्रकारचा नियम आणण्याचा प्रयत्न झाला होता, पण त्याची अंमलबजावणी पूर्णपणे झाली नव्हती. मात्र, आता देशातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर हा नियम कठोरपणे राबवला जाईल. प्रवाशांनी सामानाची मर्यादा ओलांडल्यास त्यांना दंड भरावा लागेल.
वेगवेगळ्या श्रेणीतील प्रवाशांसाठी वजन मर्यादा :
रेल्वेच्या वेगवेगळ्या वर्गांनुसार प्रवाशांना मोफत घेऊन जाण्याची सामान मर्यादा वेगवेगळी ठेवण्यात आली आहे.
प्रथम श्रेणी एसी कोच : 70 किलो पर्यंत सामान
एसी सेकंड क्लास : 50 किलो पर्यंत सामान
स्लीपर कोच : 40 किलो पर्यंत सामान
जनरल तिकीट : 35 किलो पर्यंत सामान
प्रवाशांना ठरवलेल्या वजन मर्यादेपेक्षा 10 किलो अतिरिक्त सामान मोफत नेता येणार आहे. मात्र त्यापेक्षा अधिक सामान असल्यास ते स्टेशनवरून बुकिंग करूनच प्रवासात नेण्याची परवानगी असेल.
Indian Railway Luggage Rule | दंड आणि प्रवाशांची सुरक्षितता :
जर एखाद्या प्रवाशाकडे ठरलेल्या वजनापेक्षा अधिक सामान आढळलं, तर त्याला नियमित लगेज शुल्काच्या दीडपट दंड भरावा लागेल. त्यामुळे नियम मोडणं प्रवाशांसाठी महागात पडणार आहे. (Indian Railway Luggage Rule)
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, हा निर्णय प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तसेच सोयीसाठी महत्त्वाचा आहे. अनेक प्रवासी प्रवासात मोठं आणि जड सामान घेऊन जातात, ज्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होतो आणि सुरक्षिततेवरही परिणाम होतो. सणासुदीच्या दिवसांत व गर्दीच्या हंगामात हा नियम विशेषतः फायदेशीर ठरणार आहे.






