Maharashtra Weather Update | गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने कहर माजवला असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील लाखो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. अशा पार्श्वभूमीवर पुढील पाच दिवस राज्यासाठी अतिशय महत्त्वाचे असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आज आठ जिल्ह्यांना रेड अलर्टसदृश इशारा :
राज्यात आज आठ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यात कोकणातील रायगड, रत्नागिरी, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा यांचा समावेश आहे. (Rain Red Alert)
याशिवाय विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांनाही अतिवृष्टीचा इशारा आहे. या भागांमध्ये नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, सुरक्षित ठिकाणी थांबावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असा सल्ला दिला आहे.
Maharashtra Weather Update | ऑरेंज आणि यलो अलर्टची स्थिती :
राज्यातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तब्बल २० जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, अकोला, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, वाशिम यांचा समावेश आहे. या सर्व जिल्ह्यांतील नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन आहे.
हवामान विभागानुसार राज्यात २७ आणि २८ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता जास्त आहे. शनिवारी २१ जिल्ह्यांना आणि रविवारी २२ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला गेला आहे. यामध्ये मुंबई, ठाणे आणि संपूर्ण कोकणासह घाटमाथा भागांचा समावेश आहे. मराठवाड्यातील लातूर, नांदेड आणि धाराशीव यांनाही ऑरेन्ज अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)
प्रशासनाची तयारी आणि नागरिकांना सूचना :
संपूर्ण महाराष्ट्रात सतत पावसामुळे नद्या-नाले धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाने बचाव पथके सज्ज ठेवली असून, लोकांनी अफवांवर विश्वास न ठेवता हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांनुसार वागावे.






