Monsoon Update | राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा दमदार पुनरागमन केले असून विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होत आहे. भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यभर पावसाचा जोर, अनेक भागांना हवामानाचा इशारा :
जुलै महिन्याच्या सुरुवातीला जोरदार पाऊस झाल्यानंतर काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा जोर पकडला आहे. मुंबई (Mumbai), उपनगरांसह पुणे (Pune), ठाणे (Thane), छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), जालना तसेच विदर्भ (Vidarbha) परिसरातील अनेक शहरांमध्ये जोरदार सरी कोसळत आहेत. मुंबईत मंगळवार रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असून 22 जुलै 2026 रोजी शहरासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तासांत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
याशिवाय अरबी समुद्र ते दक्षिण गुजरात, राजस्थान, ओडिशा (Odisha), छत्तीसगड (Chhattisgarh), मध्यप्रदेश (Madhya Pradesh) आणि बंगालचा उपसागर (Bay of Bengal) या विस्तृत पट्ट्यातही कमी दाबाची स्थिती सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला असून ठाणे, रायगड, पालघर (Palghar), नाशिक (Nashik), सातारा (Satara) घाटमाथा आणि कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, रत्नागिरी (Ratnagiri), नाशिक आणि विदर्भातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून या भागांसाठी येलो अलर्टही लागू करण्यात आला आहे.
Monsoon Update | धरणांतून विसर्ग सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा :
सतत सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून प्रशासनाने धरणांतून नियंत्रित पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. कडवा धरणातून 374 क्युसेक, भावली धरणातून 1,218 क्युसेक आणि पालखेड धरणातून 1,392 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार कायम असून जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.






