Bjp | राज्यात महायुतीच्या जोरदार विजयानंतर विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांची पावले सत्ताधाऱ्यांकडे वळताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad Pawar Faction) पक्षाचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil). सध्या ते वारंवार भाजप (BJP) नेत्यांच्या संपर्कात असून, त्यातून त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा रंगत आहे.
‘हा’ नेता पुन्हा भाजपमध्ये जाणार?
नुकताच त्यांनी महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची भेट घेतली. याआधीही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे स्वागत करताना आढळले होते.
काही वर्षांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करताना हर्षवर्धन पाटील यांनी “आता शांत झोप लागते, चौकशी नाही, त्रास नाही,” असे वक्तव्य केल्याने त्यावेळीही त्यांच्या भूमिकेची चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्या ‘शांत झोपे’चा मुद्दा चर्चेत आला आहे. भाजप नेत्यांसोबतच्या वारंवार भेटी या नव्या राजकीय समीकरणांचा इशारा देत आहेत का, याबाबत राजकीय वर्तुळात प्रश्न निर्माण झाले आहेत.
हर्षवर्धन पाटलांनी घेतली बावनकुळे यांची भेट
हर्षवर्धन पाटील यांनी माध्यमांशी बोलताना आजची बैठक ही त्यांच्या इंदापूर (Indapur) मतदारसंघातील एका महसूल विषयासाठी होती, असे स्पष्ट केले. मात्र त्यांनी यावेळी सत्ताधारी-विरोधकांनी मिळून काम करावे असेही म्हटले. हा त्यांच्या भावी राजकीय निर्णयाचा इशारा मानला जात आहे.
भाजपशी वाढत्या संपर्कामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासाठी हा संभाव्य धक्का ठरू शकतो.
याआधीही हर्षवर्धन पाटील यांनी राजकीय पक्ष बदलले आहेत, त्यामुळे त्यांचा आगामी निर्णय कोणता असेल याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर सध्या राजकीय विश्लेषक आणि माध्यमांचं बारीक लक्ष आहे.






