Crop Loan Online | राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासादायक निर्णय समोर आला असून, आता पीक कर्जासाठी बँकांच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. शासनाच्या पुढाकाराने आणि रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शेतकऱ्यांना आता घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने पीक कर्जासाठी अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे, अर्ज मंजूर झाल्यास अवघ्या दोन दिवसांत कर्जाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
आतापर्यंत पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कागदपत्रांची पूर्तता करावी लागत होती. यामुळे वेळ, पैसा आणि मानसिक ताण वाढत होता. मात्र, या नव्या ऑनलाइन व्यवस्थेमुळे संपूर्ण कर्जप्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक होणार असल्याचे सांगितले जात आहे.
जनसमर्थ पोर्टलवरून थेट अर्जाची सुविधा :
राज्यातील शेतकरी आता www.jansamarth.in या जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून थेट पीक कर्जासाठी अर्ज करू शकणार आहेत. शेताच्या बांधावर बसूनही मोबाईल किंवा संगणकाच्या साहाय्याने अर्ज सादर करता येणार असून, सर्व कागदपत्रे योग्य असल्यास फक्त दोन दिवसांत कर्जाची रक्कम खात्यात जमा होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Crop Loan Online)
ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाने आधीच मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्यानुसार जनसमर्थ पोर्टलचा वापर करून आता किसान क्रेडिट कार्ड (KCC) अंतर्गत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Crop Loan Online | लवकरच राज्यभर अंमलबजावणीची शक्यता :
घरबसल्या पीक कर्जासाठी अर्ज करण्याची ही योजना सध्या प्रायोगिक (पायलट प्रोजेक्ट) स्वरूपात राबवली जात असून, यासाठी सोलापूर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या नव्या उपक्रमाची माहिती दिली आहे. या ऑनलाइन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना बँकांमध्ये रांगा लावण्याची गरज राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (Farmer News)
किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत या पोर्टलवरून २ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज मिळू शकणार आहे. अर्जासाठी शेतकऱ्यांकडे Farmer ID (शेतकरी ओळख क्रमांक) असणे बंधनकारक आहे. तसेच आधारकार्ड, आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर, बँक पासबुक आणि पॅनकार्ड (असल्यास) ही आवश्यक कागदपत्रे असतील.
कोणतेही शुल्क नाही; मदतीसाठी सेतू आणि महा ई-सेवा केंद्रांचा सहभाग :
या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शासकीय शुल्क आकारले जाणार नाही. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा व तालुका प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवली जाणार आहे. तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा अग्रणी बँकेचे प्रतिनिधी यांच्या समन्वयाने याचे वेळापत्रक ठरवण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना अर्ज करताना अडचण येऊ नये यासाठी सेतू केंद्रे, महा ई-सेवा केंद्रे आणि ग्राहक सेवा केंद्रे मदतीसाठी उपलब्ध असणार आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
ही योजना यशस्वी ठरल्यास भविष्यात महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही ती राबवली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.






