Entertainment News | मराठी चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध चित्रपट व मालिका दिग्दर्शक आशिष उबाळे (Ashish Ubale) यांनी आत्महत्या करून जीवन संपवले आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.
आर्थिक अडचणी कारणीभूत?
आशिष उबाळे हे गेल्या काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये आपल्या भावाकडे गेले होते. दरम्यान घटनेच्या आधी म्हणजे दुपारी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास रामकृष्ण मठ (Nagpur Ramkrishna Math) येथे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, त्यांनी अधिक तपास सुरू केला आहे.
आशिष उबाळे हे ‘अग्नी’, ‘एका श्वासाचे अंतर’, ‘बाबुरावला पकडा’ अशा मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये दिग्दर्शन करत होते. त्यांचे दोन चित्रपट अजून प्रदर्शित व्हायचे होते. मात्र सततच्या आर्थिक अडचणी, कर्जबाजारीपणा आणि त्यामुळे निर्माण झालेली नैराश्याची भावना यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.
व्हॉट्सअॅप नोटमधून आत्महत्येचा संकेत-
आत्महत्येपूर्वी आशिष उबाळे यांनी व्हॉट्सअॅपवर एक शेवटची नोट लिहिल्याचं सांगितलं जात आहे. या नोटमध्ये त्यांनी आपल्या वैयक्तिक संघर्षांचा उल्लेख केला होता. त्यातून त्यांच्या मानसिक अवस्थेचा अंदाज येतो. त्यांच्या अचानक जाण्यामुळे चाहते, सहकारी कलाकार आणि मराठी सिनेसृष्टीतील व्यक्तींमध्ये दुःख आणि धक्का व्यक्त केला जात आहे.
एफटीआयएमधून शिक्षण-
पुण्याच्या एफटीआय (FTII) संस्थेतून पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आशिष उबाळे यांनी मुंबईत आपलं नशीब आजमावलं. त्यांनी ‘गजरा’, ‘अग्नी’, ‘एका श्वासाचे अंतर’, ‘किमयागार’, ‘चक्रव्यूह’ या गाजलेल्या मालिका दिग्दर्शित केल्या.
चित्रपट क्षेत्रातही त्यांनी ‘गार्गी’, ‘आनंदाचे डोही’ आणि ‘बाबुरावला पकडा’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं. विशेष म्हणजे ‘गार्गी’ चित्रपटाची निवड कार्ल्सबर्ग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी झाली होती. तरीही आर्थिक संकटामुळे त्यांच्या आयुष्याचा शेवट इतक्या वेदनादायक पद्धतीने होईल, हे कुणालाही अपेक्षित नव्हतं.






