Dhirendra Shastri | बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Shastri) यांच्या सनातन एकता पदयात्रेदरम्यान तब्येतीची गंभीर समस्या समोर आली आहे. सलग तीन दिवस प्रकृती खालावलेली असताना त्यांनी यात्रेचा वेग कमी न करता पुढे चालू ठेवला. मात्र मथुरेत पदयात्रेच्या आठव्या दिवशी तर त्यांची अवस्था इतकी बिकट झाली की भर रस्त्यातच ते अचानक कोसळले. श्वास घेण्यास त्रास, उच्च ताप आणि लो ब्लड प्रेशरमुळे त्यांना रस्त्यावरच झोपून आराम करावा लागला.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri Health Update) यांच्या फुफ्फुसात प्रदूषण आणि धूळ मोठ्या प्रमाणात साचल्याने त्यांना श्वसनाचा गंभीर त्रास जाणवला. यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात रस्ता धुळीचा असल्यामुळे प्रकृती अधिक ढासळली. डॉक्टरांनी त्यांना मास्क घालण्याचा सल्ला दिला होता; मात्र त्यांनी तो सल्ला स्वीकारला नाही. त्यानुसार त्यांना 100 अंश फॅरेनहाइट ताप असून रक्तदाबही लक्षणीयरीत्या कमी आहे.
अनवाणी चालण्याचा परिणाम, डॉक्टरांची चिंता :
पदयात्रेच्या पहिल्या दिवसापासून धीरेंद्र शास्त्री यांची तब्येत ढासळत चालली होती. तरीही कोणत्याही भावना दुखावू नयेत म्हणून त्यांनी यात्रा थांबवण्याचा विचार न करता औषधेही घेण्यास नकार दिला, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. सलग अनेक किलोमीटर अनवाणी चालल्याचा मोठा परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाला असून त्यांच्यासोबत असलेल्या उत्तर प्रदेशातील नेते राजा भैया यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली.
प्रकृती बिघडूनही त्यांनी थांबण्यास नकार दिला. लोकांनी रस्त्यात त्यांना टॉवेलने वारा घालून आराम देण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांना त्वरित विश्रांती आणि उपचारांची गरज आहे. तरीही धीरेंद्र शास्त्री पदयात्रा पुढे चालू ठेवण्यासाठी ठाम राहिले.
Dhirendra Shastri | विरोधकांवर टीका आणि वादग्रस्त विधानांनी वाढली चर्चा :
शारीरिक स्थिती अत्यंत नाजूक असतानाही धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. कोसी कलामधील सभेत ते म्हणाले की, “ज्यांना राम नाम, वंदे मातरम किंवा जय श्री राम म्हणण्यात अडचण आहे, त्यांनी थेट लाहोरचे तिकीट बुक करावे. पैसे नसतील तर आम्ही तिकीटांचे पैसे देऊ.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की ते मुस्लिमांविरोधात नाहीत, तर देशाचे शत्रू असलेल्या लोकांविरोधात बोलत आहेत.
त्यांनी हिंदू समाजातील काही लोकांनाही टोला लगावला आणि “विरोध करणाऱ्या हिंदूंनी डीएनए टेस्ट करून घ्यावी,” असे विधान केले. त्यांच्या टीकात्मक भाषणामुळे पदयात्रेइतकाच राजकीय वादही उभा राहिल्याची चर्चा आहे.
पदयात्रा पूर्ण करणार का? :
दंगलखोर आणि धार्मिक अतिरेक्यांच्या शिक्षण धोरणावरही त्यांनी भाष्य केले. “दंगलखोरांचे शिक्षण धोरण म्हणजे बॉम्बस्फोट करणे, तर सनातनी नारळ फोडतात हे देशाचे दुर्दैव आहे,” असे वक्तव्य त्यांनी यापूर्वी केले होते. त्यांचे म्हणणे आहे की मुस्लिम समाजातून अब्दुल कलामसारखे विद्वान पुढे यावेत आणि त्यासाठी शिक्षणाची दिशा बदलणे आवश्यक आहे. या विधानांमुळे त्यांच्या पदयात्रेतील भाषणांवर राष्ट्रव्यापी चर्चा सुरू आहे.
सनातन एकता पदयात्रा एकूण 55 किलोमीटरची असून 16 नोव्हेंबर रोजी ती संपणार आहे. गुरुवारी त्यांनी मथुरा सीमा ओलांडून दिल्ली, हरियाणा मार्गे पुन्हा उत्तर प्रदेशात प्रवेश केला. प्रकृती खालावलेली असताना ते पदयात्रा पूर्ण करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






