Chhagan Bhujbal | राज्यातील आरक्षणाच्या वादाला नवं वळण मिळालं आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाविषयी आपली स्पष्ट भूमिका मांडली. “मराठा समाजाला आधीच 10 टक्के EWS आरक्षण मिळालं आहे, मग ते नको आहे का? ओपनमधील लाभ नको आहेत का?” असा थेट सवाल त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवी खळबळ माजली आहे.
“मराठा समाजाला ओबीसीत घेता येत नाही” :
भुजबळ म्हणाले, “मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांना ओबीसी प्रवर्गात घेता येत नाही. सरकारने हैदराबाद गॅझेटप्रमाणे निर्णय घेतले, त्यामुळे गोंधळ वाढला आहे.” त्यांनी सांगितले की, असल्या निर्णयांमुळे ओबीसी आणि भटक्या-विमुक्त समाजाचं नुकसान होत आहे.
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावरही भाष्य केलं. “जरांगेंनी तीन-चार दिवस दक्षिण मुंबई बंद ठेवून दबाव निर्माण केला. सरकारने दबावाखाली निर्णय घेतला. त्याचा परिणाम आता ओबीसींसह इतर मागास समाजांवर होत आहे,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
Chhagan Bhujbal | EWS आरक्षणावरून प्रश्न :
भुजबळांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की, “मराठा समाजासाठी आधीच EWS प्रवर्गात 10 टक्के आरक्षण आहे. मग ते सोडून ओबीसींच्या हक्कांवर डल्ला का? ओपन कॅटेगरीतील संधींचा लाभ का नको? याचं उत्तर मराठा समाजातील सुजाण लोकांनी द्यावं.”
भुजबळांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण वाद पेटण्याची शक्यता आहे. ओबीसी समाज आधीच आक्रमक झाला असून, कोर्टात जाण्याची तयारी करत आहे. भुजबळांचा (Chhagan Bhujbal) सवाल हा मराठा समाजातील नेतृत्वालाच थेट उद्देशून आहे, त्यामुळे या वक्तव्याचे पुढील राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.






