Farmer Loan Waiver | राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने (Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme) अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. पुढील आठवड्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असून, त्याआधी शेतकऱ्यांना आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही, हे सहज तपासता येणार आहे.
लाभार्थी यादी कुठे आणि कशी पाहता येणार? :
गेल्या 12 वर्षांतील ही राज्यातील तिसरी मोठी कर्जमाफी योजना ठरणार आहे. यापूर्वी 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने कर्जमाफी जाहीर केली होती, तर 2019 मध्ये महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारने कर्जमुक्ती योजना राबवली होती. आता फडणवीस सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 लागू केली असून, 5 जुलैनंतर तिची अंमलबजावणी सुरू होणार आहे. प्रत्यक्ष लाभ जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी विविध बँकांकडील पात्र शेतकऱ्यांची माहिती विशेष डिजिटल पोर्टलवर अपलोड केली जात आहे. प्रत्येक लाभार्थ्याला स्वतंत्र युनिक क्रमांक देण्यात येणार आहे. लाभार्थी याद्या ग्रामपंचायत (Gram Panchayat), तलाठी (Talathi) कार्यालय, संबंधित बँका, विविध सहकारी विकास संस्था, कार्यकारी संस्था, आपले सरकार सेवा केंद्र (Aaple Sarkar Seva Kendra) तसेच ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर संदेशही पाठवण्यात येणार आहे. नाव यादीत नसल्यास किंवा तांत्रिक अडचण आल्यास जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेली स्वतंत्र यंत्रणा मदत करणार आहे.
Farmer Loan Waiver | योजनेत मिळणारे लाभ आणि आवश्यक प्रक्रिया :
या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची संपूर्ण माफी करण्यात येणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल. तसेच दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता (One Time Settlement – OTS) योजनेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेद्वारे राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना एकूण 36 हजार 500 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका आणि प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांमार्फत ही योजना राबवली जाणार असून संपूर्ण प्रक्रिया महाआयटी (MahaIT) च्या माध्यमातून डिजिटल स्वरूपात पार पडणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणताही स्वतंत्र अर्ज भरावा लागणार नाही. मात्र, आधार क्रमांकाची पडताळणी पूर्ण करणे आवश्यक असेल. यासाठी सहकारी आणि व्यापारी बँकांना शेतकऱ्यांचे आधार क्रमांक अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनीही स्वतःचे आधार प्रमाणीकरण वेळेत पूर्ण केल्यास कर्जमाफीचा लाभ मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.






