ESMA Act India | मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत देशभरात Essential Services Maintenance Act (ESMA) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. गॅस सिलिंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये आणि लोकांनी मोठ्या प्रमाणात साठा करू नये यासाठी सरकारने ही कठोर पावले उचलली आहेत.
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या Iran-Israel युद्धामुळे तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे भारतात व्यावसायिक गॅस सिलिंडरची टंचाई जाणवत आहे. घरगुती गॅस उपलब्ध असला तरी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
ESMA कायदा नेमका काय आहे? :
सरकारने लागू केलेला Essential Services Maintenance Act हा कायदा अत्यावश्यक सेवांचा पुरवठा अखंडित राहावा यासाठी तयार करण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतूक, आरोग्यसेवा, ऊर्जा आणि इंधन यांसारख्या सेवांमध्ये अडथळा निर्माण होऊ नये हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे.
या कायद्याअंतर्गत सरकारला काही आपत्कालीन अधिकार मिळतात. जर कोणत्याही कारणामुळे अत्यावश्यक सेवांमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता असेल तर सरकार थेट हस्तक्षेप करून आवश्यक आदेश जारी करू शकते. त्यामुळे गॅस, वीज किंवा वाहतूक यांसारख्या सेवांचा पुरवठा सुरळीत ठेवता येतो.
ESMA Act India | रिफायनरीजना उत्पादन वाढवण्याचे आदेश :
सरकारने या कायद्यांतर्गत तेल शुद्धीकरण कारखान्यांना LPG उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रमुख हायड्रोकार्बन स्रोत LPG पूलमध्ये वळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून घरगुती स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा अबाधित राहील.
भारताची गॅस आयात मोठ्या प्रमाणावर मध्यपूर्वेवर अवलंबून आहे. विशेषतः Strait of Hormuz या महत्त्वाच्या सागरी मार्गावरून मोठ्या प्रमाणात तेल आणि गॅस वाहतूक केली जाते. सध्या या भागातील तणावामुळे पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने सरकारने आधीच तयारी सुरू केली आहे.
महाराष्ट्रात गॅस सिलिंडरसाठी लांब रांगा :
गॅस टंचाईच्या शक्यतेमुळे देशातील काही भागांमध्ये नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि कोल्हापूर येथे अनेक ठिकाणी गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्याचे चित्र दिसत आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे भविष्यात गॅसची टंचाई निर्माण होऊ शकते या भीतीने अनेक लोकांनी सिलिंडरचा आगाऊ साठा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुरवठा सुरळीत राहावा आणि कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी सरकारकडून कडक उपाययोजना केल्या जात आहेत.






