BJP Leader | पश्चिम बंगालच्या राजकारणात एकेकाळी वजनदार असलेले इंद्रजीत सिन्हा बीरभूम जिल्ह्यातील तारापीठ स्मशानभूमीत भीक मागताना दिसले. ‘बुलेट दा’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या नेत्याची आजारपणातील फोटो व्हायरल होताच खळबळ उडाली. पक्षाच्या जुन्या नेत्याची अवस्था पाहून राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. सुकांत मजुमदार यांनी तात्काळ पावले उचलली.
त्यांनी तत्काळ बीरभूमच्या भाजप जिल्हाध्यक्षांना आजारी इंद्रजीत सिन्हा (BJP Leader indrajit sinha) यांना रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. राज्याचे विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनीही सिन्हा यांची दखल घेतली. यानंतर ‘बुलेट दा’ यांना कोलकात्याच्या एका मोठ्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कोण आहेत इंद्रजीत सिन्हा?
इंद्रजीत सिन्हा (BJP Leader indrajit sinha) हे एकेकाळी बंगाल भाजपमध्ये आरोग्य सेवा सेलचे संयोजक होते. त्यांनी भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांना अडचणीच्या आणि संकटाच्या काळात राज्यातील जवळपास सर्वच सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल करण्याचे काम केले होते.

तत्कालीन प्रदेशाध्यक्ष राहुल सिन्हा यांचे ऐकून ‘बुलेट दा’ राजकारणात आले आणि आरोग्य क्षेत्रात भाजपची उपस्थिती वाढवण्यासाठी त्यांनी दिवसरात्र काम केले. त्यांच्या कार्यकाळात त्यांचे नाव आणि प्रसिद्धी राजकीय वर्तुळात पसरली होती.
कॅन्सरशी झुंज आणि दयनीय अवस्था-
राज्यात आरोग्य क्षेत्रात एकेकाळी वजनदार असलेले नेते इंद्रजीत सिन्हा (BJP Leader Indrajit Sinha) गेल्या दोन वर्षांपासून दुर्धर अशा कर्करोगाने ग्रस्त आहेत. प्रथम ट्यूमरचे निदान झाले, नंतर त्यांना कर्करोग झाल्याचे समजले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयही मिळू शकले नाही. इतकेच नाही तर त्यांच्या राहण्याची आणि खाण्याचीही कोणतीही योग्य व्यवस्था नाही.
परिस्थिती इतकी दयनीय आहे की दोन महिने त्यांना तारापीठ स्मशानभूमीत जेवणासाठी भीक मागावी लागली. भाजप राज्य समितीच्या या माजी निमंत्रित सदस्याला एका झाडाखाली रात्र काढावी लागली. 40 वर्षीय सिन्हा अविवाहित असून त्यांच्या आई-वडिलांचे आधीच निधन झाले आहे.
भाजपसाठी केले होते अथक काम-
इंद्रजीत सिन्हा सुमारे दहा वर्षांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यांनी पक्षासाठी अथक काम केले. भाजप आता पश्चिम बंगालमध्ये मुख्य विरोधी पक्ष आहे. पण आता आजारपणामुळे सिन्हा पक्षाचे काम करू शकत नाहीत आणि कुटुंबात कोणीही नसल्याने त्यांनी तारापीठ येथे जाऊन भीक मागण्यास सुरुवात केली.






