MNS Shivsena | राजकारणात बहुप्रतिक्षित असलेल्या मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीचा बिगुल अखेर वाजला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेली ही युती आता बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत प्रत्यक्षात दिसणार आहे. 18 ऑगस्ट 2025 रोजी होणाऱ्या या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या बेस्ट कामगार सेनेने आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कर्मचारी सेनेने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. (MNS Shivsena)
या युतीची अधिकृत घोषणा बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास जी सामंत आणि मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी संयुक्तरित्या केली आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्याने निवडणुकीच्या राजकारणात नवा रंग भरला आहे. ही युती केवळ बेस्टमध्येच नव्हे तर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठीही नांदी ठरेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.
मराठी अस्मितेचा नवा सूर? ठाकरे बंधू एकत्र :
सध्याच्या राजकीय वातावरणात ठाकरे ब्रँडची चर्चा वाढत आहे. मराठी अस्मितेचा मुद्दा उचलून धरताना राज आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं हे मराठी माणसाच्या हितासाठी मोठं पाऊल मानलं जात आहे. अनेक पदाधिकारी हे दोन्ही पक्षांशी निगडित असल्याने बेस्टमध्ये ही युती अधिक मजबूत होणार आहे.
सध्याचं सरकार बेस्ट उपक्रमातील रोजगार खासगी हातात देण्याचा डाव खेळत असल्याचा आरोप या युतीच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे बेस्टमधील मराठी कामगारांमध्ये असंतोष वाढला असून ठाकरे-मनसे युतीने त्यांना नव्याने आशा दिली आहे.
MNS Shivsena | कामगारांचे प्रश्न आणि युतीचा प्रभाव :
उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात बेस्ट कर्मचाऱ्यांना महापालिकेकडून नियमित ग्रॅज्युएटी मिळत होती. मात्र, महायुती सरकार आल्यापासून ती प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी थकली असून नवीन भरतीही थांबली आहे. परिणामी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. (MNS Shivsena)
बेस्ट पतपेढीवर सध्या बेस्ट कामगार सेनेची सत्ता आहे. मागील नऊ वर्षांत संचालक मंडळाने केलेल्या कामगारहिताच्या निर्णयांमुळे संघटनेचा जनाधार वाढला आहे. त्यात आता मनसेचा पाठिंबा मिळाल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीचा सकारात्मक परिणाम होणार हे निश्चित मानलं जात आहे.






