Bharat Karad Death | राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादाला आता टोकाचं वळण लागलं आहे. लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने संभाव्य आरक्षण संपुष्टात येण्याच्या भीतीने आयुष्य संपवलं. हा शेतकरी म्हणजे भरत महादेव कराड (३५, रा. वांगदरी, ता. रेणापूर). त्यांची आत्महत्या आणि त्यांनी लिहिलेली चिठ्ठी वाचून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
आत्महत्येआधीची चिठ्ठी :
भरत कराड यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे, “मी भरत महादेव कराड… महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करून ओबीसींचं कायमस्वरूपी आरक्षण संपवलं आहे. मी वेळोवेळी ओबीसी बचाव आंदोलनात सहभाग घेतला होता. तरीही सरकारने ओबीसी समाजाचा घात करून विरोधी जीआर काढल्यामुळे मी जीवन संपवत आहे. माझ्या पश्चात कुटुंबाला आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा.”
ही चिठ्ठी त्यांनी मुलांच्या वहितील कागद फाडून लिहिली होती. त्यांच्या थरथरणाऱ्या अक्षरांमधून त्यांचा मानसिक तणाव आणि वेदना स्पष्ट दिसत होत्या.
Bharat Karad Death | कुटुंबाचा आक्रोश :
भरत कराड यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ते मागे पत्नी, तीन मुली, एक मुलगा, आई-वडील आणि तीन भाऊ असा मोठा परिवार सोडून गेले आहेत. कुटुंबीयांनी सरकारकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
भरत कराड गेल्या अनेक वर्षांपासून शेती करत होते. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयानंतर ते अधिक चिंतेत होते. भविष्यात त्यांच्या मुलांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळणार नाही या विचारानेच ते खचले. या निराशेनेच त्यांनी जीवन संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं.
छगन भुजबळांची भेट :
या घटनेनंतर ओबीसी आरक्षणाचे प्रमुख नेते छगन भुजबळ लातूरला गेले. त्यांनी भरत कराड यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी सरकारकडे न्यायासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासनही दिलं.
भरत कराड यांच्या मृत्यूमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या चिठ्ठीतील शब्दांनी अनेकांच्या मनाला चटका लावला आहे. हा बळी केवळ एका कुटुंबाचा नाही तर संपूर्ण ओबीसी समाजाच्या वेदनेचं प्रतीक ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.






