Bharat Bandh | 12 फेब्रुवारी रोजी देशभरात भारत बंदची हाक देण्यात आली असून कामगार संघटना, बँक कर्मचारी आणि शेतकरी संघटनांनी या संपात सहभागी होण्याची घोषणा केली आहे. नवीन कामगार कायदे, भारत-अमेरिका व्यापारी करार, मनरेगामधील बदल यांसारख्या मुद्द्यांवर नाराजी व्यक्त करत हा देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. (Bharat Bandh News)
भारत बंदचं कारण काय?
या भारत बंदमध्ये INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF आणि UTUC या 10 केंद्रीय ट्रेड युनियनचा सहभाग आहे. नवीन लेबर कोडमुळे कामगारांचे अधिकार कमी होतील, नोकरीची सुरक्षा धोक्यात येईल आणि खासगीकरणाला चालना मिळेल, असा आरोप संघटनांनी केला आहे. तसेच मनरेगासह सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये बदल करण्यास विरोध दर्शवण्यात आला आहे.
देशपातळीवर शाळा, महाविद्यालये किंवा सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा कोणताही अधिकृत आदेश नाही. मात्र केरळ, कर्नाटक आणि ओडिशा यांसारख्या काही राज्यांमध्ये बंदचा प्रभाव जास्त जाणवण्याची शक्यता आहे. सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाल्यास खबरदारीचा उपाय म्हणून काही ठिकाणी शाळा आणि कॉलेज प्रशासन स्थानिक पातळीवर सुट्टी जाहीर करू शकते.
Bharat Bandh | बँका आणि इतर सेवा काय स्थितीत असतील? :
12 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कामकाज प्रभावित होण्याची शक्यता आहे, कारण बँक कर्मचारी संघटनांनी संपात सहभागी होण्याची घोषणा केली आहे.
मात्र रिझर्व्ह बँक किंवा केंद्र सरकारकडून अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही. रुग्णालये, औषध दुकाने आणि इतर अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत, तर सार्वजनिक वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो.






