Beed Ahilyanagar Railway | बीड आणि अहिल्यानगर रहिवाश्यांसाठी ऐतिहासिक क्षण जवळ आला आहे. रेल्वे मार्गापासून कोसो दूर असलेले बीड शहर अखेर भारतीय रेल्वेच्या नकाशावर झळकणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी, म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडीचा शुभारंभ होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याचा निर्णय घेण्यात आला.
अनेक दशकांपासून रेल्वेसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या बीडकरांसाठी ही मोठी आनंदवार्ता आहे. या मार्गामुळे प्रवास सोयीस्कर होणार असून, बीड जिल्ह्याच्या सामाजिक-आर्थिक विकासालाही गती मिळणार आहे.
मार्गाची वैशिष्ट्ये आणि पुढील योजना :
अजित पवार यांनी बैठकीत स्पष्ट केले की, बीड ते परळी वैजनाथ या रेल्वे मार्गावरील अडथळे दूर करून काम गतीने पूर्ण केले जाईल. भूसंपादनाची प्रकरणे जिल्हा प्रशासनाने तातडीने सोडवावी आणि आवश्यक जमीन उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, राज्य सरकारचा हिस्सा असलेले निधी तातडीने देण्याचाही निर्णय घेण्यात आला. (Beed Ahilyanagar Railway)
याचबरोबर फलटण-लोणंद मार्गावरील प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बारामती स्थानकावरील कामे जलदगतीने पूर्ण करून प्रवाशांच्या सेवेसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध कराव्यात, असेही निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिले.
Beed Ahilyanagar Railway | असा असेल रेल्वे मार्ग :
एकूण लांबी: २६१.२५ किलोमीटर
जमिनीचे भूसंपादन: १८२२.१६८ हेक्टर
रेल्वे खालील पूल: १३०
रेल्वेवरील पूल: ६५
मोठे पूल: ६५
छोटे पूल: ३०२
एकूण प्रकल्प किंमत: ₹४८०५.१७ कोटी
केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा: प्रत्येकी ₹२४०२.५९ कोटी (५०:५० प्रमाणात)
दरम्यान, या रेल्वेमुळे बीड ते अहिल्यानगर प्रवासाला नवी दिशा मिळणार आहे. उद्योगधंदे, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळेल. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी ही रेल्वे महत्त्वाची ठरणार आहे, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






