Beed News | बीड (Beed) जिल्ह्यातील माजलगाव (Majalgaon) तालुक्यातील किटी आडगाव या गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि भाजपचे (BJP) निष्ठावान कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांची क्रूरपणे हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. भरदिवसा घडलेला हा थरार पाहणाऱ्यांची थरकाप उडवणारा होता, तर आरोपीने स्वतःहून पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे.
कोयत्याने केला भीषण हल्ला-
भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांची भेट घेण्यासाठी कार्यालयात जात असताना बाबासाहेब आगे यांच्यावर अचानक प्राणघातक हल्ला करण्यात आला. आरोपी नारायण शंकर फपाळ याने आपल्या अंगातील शर्टच्या मागे लपवलेला कोयता बाहेर काढत बाबासाहेब आगे यांच्यावर हल्ला केला. काही सेकंदांतच ते रक्तबंबाळ होऊन खाली कोसळले.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी ही क्रूर घटना प्रत्यक्ष पाहिली. मात्र, हल्ला इतक्या वेगाने झाला की, कोणीच वेळेवर (Beed News) हस्तक्षेप करू शकले नाही. हल्ल्यानंतर नारायण फपाळ थेट माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने बाबासाहेब आगे यांचा खून केल्याची कबुली दिली. सुरुवातीच्या तपासात हा खून आर्थिक वादातून घडल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
पत्नीच्या कथनानं उघड झालं खऱ्या कारणाचं गूढ-
पोलिस तपास पुढे सरकताना या प्रकरणाला वेगळं वळण (Beed News) मिळालं आहे. आरोपी नारायण फपाळ याच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब आगे हे तिच्यासाठी भावासारखे होते आणि त्यांनी केवळ मदतीच्या हेतूने सहकार्य केलं होतं.
तिच्या पतीला दारूचे व्यसन असल्याने तो वारंवार तिच्यावर संशय घेत असे आणि तिच्याशी गैरवर्तन करत असे. गावातील काही पुरुषांवर तो संशय घेत असे आणि बाबासाहेब आगे यांच्याबाबतही त्याच्या मनात शंका निर्माण झाली होती. या संशयातूनच हे दुर्दैवी आणि अमानुष कृत्य घडल्याचं ती म्हणाली.
पंकजा मुंडेंनी व्यक्त केला दुःखद शोकभाव-
या हत्येची माहिती मिळताच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पुढाकार घेत बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी बाबासाहेब आगे यांचा उल्लेख “धडाडीचा कार्यकर्ता” असा करत त्यांच्या निधनाने मन सुन्न झाल्याचं सांगितलं.
आज दि. 19 एप्रिल रोजी घाटशीळ पारगाव येथील कार्यक्रम पूर्ण करून त्या दुपारी तीनच्या सुमारास माजलगाव येथे जाणार असून बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांचं सांत्वन करणार आहेत.






